नागपूर : प्रतिनिधी
हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत कर्जमाफीतील घोटाळे जनतेसमोर आणण्याचे आव्हान दिले. विरोधकांच्या या आव्हानाची तात्काळ दखल घेत हल्लाबोल करणार्यांच्या डल्लामार यात्रेचे सविस्तर पुरावेच सभागृहात सादर करणार असून राज्याच्या सद्यपरिस्थितीला पूर्वीचे सत्ताधारी आणि आताचे विरोधकच जबाबदार आहेत. त्यामुळे ते सत्तेत असताना केलेल्या सिंचनापासूनच्या सर्व घोटाळ्यांची मालिका विधीमंडळात मांडणार असल्याचा गर्भित इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीच्या प्रथेप्रमाणे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला. मात्र विरोधकांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, आज जे विरोधात आहेत त्यांचा १५ वर्षांचा सत्तखेमधील कार्यकाळ आणि आताच्या सरकारच्या कार्यकाळाची तुलनात्मक आडेकवारीच सभागृहात मांडणार असून ज्यांनी आता हल्लाबोल आंदोलन सुरू केलंय त्यांच्या सरकारमध्ये असताना केलेल्या डल्लामार यात्रेचे पुरावे सभागृहासमोर सविस्तर सादर करू. जनतेला आज जी परिस्थिती उद्भवली आहे त्याला कोण जबाबदार आहे ते सांगू.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत ऑनलाइन घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र आघाडी सरकारच्या काळात पाच हजार कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा झाला होता. त्याची चौकशी अजून सुरू असून त्याचा निर्णय लागायचा आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन प्रक्रियेमुळे जरी शिष्यवृत्तीला उशीर झाला असला तरी हा परिणाम तात्पुरता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
तसेच आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्या प्रकरणी चार एफआयआर दाखल झाले असून त्याची चार्जशिटही दाखल होणार आहे. याप्रकरणाची आणखी चौकशी सुरू असून चार्जशीट दाखल होण्याचे काम लवकर होणार असल्याचे सांगत या घोटाळ्याची संपूर्ण माहीती सभागृहात मांडणार असल्याचे त्यांनी यसांगितले.
शिवसेना आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीत शिवसेनेचेही सदस्य आहेत. आकडेवारी त्यांच्यासमोर ठेवलेली आहे. त्यामुळे आमच्यात कोणतेही वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येणार नसल्याचे सांगत शिवसेना आणि भाजप एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले.