मुंबई: प्रतिनिधी
पश्चिम बंगालचा समुद्र आणि लगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात आजपासून १५ जून पर्यंत पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देत मुंबई कोकणसह पुणे, परभणी, सातारा, हिंगोली उस्मानाबाद, नांदे़ड लातूर भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून ११ ते १५ जून पर्यत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तर याच कालावधीत धुळे, नंदूरबार, जळगांव, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण ते जोराचा पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुणे १२ जून रोजी मुसळधार तर इतर तीन दिवस अतिमुसळधार पावसाची आणि कोल्हापूरात १३ ते १५ जून हे तीन दिवस अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सातारा येथे ११ आणि १२ जून रोजी मुसळधार पाऊस पडणार असून १३ ते १५ जून या कालावधीत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.
सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना या भागात सर्वसाधारण पाऊस तपडणार असून परभणी जिल्ह्यात ११ आणि १२ जून रोजी मुसळधार पावसाची तर इतर दिवशी सर्वसाधारण पाऊस कोसळणार आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातही सर्वसाधारण पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तर हिंगोलीत वादळीवाऱ्यासह ११ ते १४ जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उस्मानाबादेतही सर्वसाधारण तर नांदेड आणि लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.