मुंबई: प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या भागात उद्या ४ ऑगस्ट २०२० रोजी पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने आज दिला. तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार असणार असल्याची माहितीही त्यांच्याकडून एका प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली.
यापूर्वीच ३ ते ६ ऑगस्ट दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सून हजेरी लावणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळ पासून मुंबईसह एमएमआर प्रदेशात पाऊस चांगलाच बरसला.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, धुळे, नंदूरबार, जळगांव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यामध्ये तीव्र आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.