मुंबई : प्रतिनिधी
काल गुलाब चक्रीवादळ तयार झाले असून ते पूर्व किनार पट्टीकडे सरकरत आहे. आज मध्यरात्री ते गोपाळपूर आणि कलिंगपट्टणम येथे धडकण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज दिला.
गुलाब चक्रीवादळामुळे २७ तारखेला मराठवाडा आणि विदर्भात, २८ तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगत वारे ही मोठ्या वेगाने वाहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
२८ सप्टेंबरपासून पुढील तीन ते चार दिवस कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगांव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
२७ तारखेला मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद मध्ये मुसळधार पावसाची आणि जोराचे गार वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाबरोबर जोराचे गार वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.