मुंबईः प्रतिनिधी
चर्नी रोड स्टेशन लगत असलेली जवाहर बालभवन लगतचा भूखंड राज्य सरकारकडून पंडित दिनदयाल सेवाभावी संस्थेला देण्याचा घेतलेला निर्णय मराठी ई-बातम्या.कॉम या संकेतस्थळावर प्रसिध्द होताच तो भूखंड सदर संस्थेला द्यायचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याचा खुलासा उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला.
मराठी ई-बातम्या संकेतस्थळावर वृत्त प्रकाशित झाल्यानंतर याबाबतचा खुलासा करण्यासाठी मंत्रालयातील पत्रकार कक्षात ते आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यासंदर्भात तावडे बोलताना म्हणाले की, अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या वेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक राज्य सरकारकडून उभारण्याचे जाहीर केले होते. त्या स्मारकासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय सेवाभावी संस्थेकडून भूखंड मागणी करणारे पत्र राज्य सरकारला दिले आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
हे स्मारक वाय.बी.प्रतिष्ठान, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आदी स्मारकाच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या स्मारकासाठी उपनगर आणि मुंबई शहरात मिळून दोन- तीन ठिकाणच्या जागांची पाहणी करण्यात आली आहे. तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय सेवाभावी संस्थेने केलेल्या मागणीवर मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
(दणक्याची बातमी वाचण्यासाठी https://www.marathiebatmya.com/cm-fadnavis-chandrakant-patil-land/ लिंकवर क्लिक करा)