विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या मागणीला यश
मुंबई : प्रतिनिधी
आगामी लोकसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारकडून यंदाचे लेखानुदान विधिमंडळात सादर करण्यासाठी अवघ्या चार दिवसाचे अधिवेशन बोलावले. परंतु राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यावर सरकारकडून करण्यात येत असलेल्या कामाची माहिती करून घेता यावी याकरिता लेखानुदान अधिवेशनाचे कामकाज एका दिवसाने वाढविण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. त्यानुसार विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज एक दिवसाने वाढविण्याचा निर्णय सांसदीय कामकाज सल्लागार समितीने घेतला.
लेखानुदान अधिवेशन घेण्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद आणि विधानसभेतील सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांच्या सल्लागार समितीची बैठक आज मंगळवारी घेण्यात आली. याबैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवसेनेचे गटनेते, सांसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी अधिवेशनाचे कामकाज २५ फेब्रुवारीला सुरु होवून २९ फेब्रुवारी २०१९ रोजी संपणार होते. परंतु विखे-पाटील यांनी दुष्काळावर विधिमंडळात चर्चा होण्याची आवश्यकता असल्याची बाब समितीच्या निदर्शनास आणून देत एक दिवसाने विधिमंडळाचे कामकाज वाढविण्याची मागणी केली. त्यावर समितीने विधिमंडळाचे कामकाज एकदिवसाने वाढविण्याचा निर्णय घेतला.