मुंबई: प्रतिनिधी
हिंग्लीश भाषेतील रिपब्लिक वृत्तवाहिनेचे संपादक-अॅकर असलेले अर्णब गोस्वामी हे सातत्याने राज्यातील नेते, मुख्यमंत्री यांच्याबाबत एकेरी शब्दात उल्लेख करत असून चुकीच्या पध्दतीचे वृत नेहमी प्रसारीत करत आहेत. त्यांच्याकडून सुपारी घेतल्यासारखे वृत्तांकन करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी करत गोस्वामी विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा ठराव आणण्यात आला. हा ठराव आणताच भाजपाचे सर्व सदस्य अध्यक्षांच्या आसानाजवळील जागेत जावून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळातच सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची घोषणा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली.
मागील काही दिवसांपासून एका अभिनेत्याच्या आत्महत्येचे वृंताकन करत असताना राज्यातील नेते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री यांचा एकेरी उल्लेख करत आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव मांडत असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सभागृहात सांगितले.
सरनाईक यांनी ठराव मांडताच भाजपाच्या सदस्यांनी जागेवर उठून त्यांच्या बोलण्याचा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी ठराव मांडला. त्यानंतर सांसदिय कार्यमंत्री अनिल परब हे गोस्वामीवरील हा हक्कभंगाचा ठराव कसा होतो हे सांगण्यासाठी उभे राहीले. त्यावेळी गोस्वामी हा पत्रकारीतेच्या नावाखाली सुपारी घेवून काम करत असल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी एका पोलिस हवालदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द वापरला म्हणून त्याला निलंबित केल्याच्या घटनेचा उल्लेख केला. तसेच अर्णब गोस्वामी हा स्वत:ला न्यायाधीशाच्या भूमिकेत वावरतो. त्यामुळे ही कसली पत्रकारीता आहे असा सवाल उपस्थित केला.
त्यांनी उल्लेख केलेल्या घटनेनंतर तर भाजपाचे सर्वच सदस्य आक्रमक करत अनिल परब यांच्या विरोधात बोलू लागले. त्यावेळी अनिल परब म्हणाले पंतप्रधानांचे नाव घेतले म्हणून राग आला का? मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल गोस्वामी एकेरी उल्लेख करतो त्याचा राग येत नाही का? असा सवाल भाजपा सदस्यांना केला. त्यावरून गोंधळ वाढल्याने अखेर सुरुवातीला सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी तहकूब केले. त्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर उपाध्यक्ष झिरवळ यांनी पुरवणी मागण्यावरील चर्चा पुकारली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी हक्कभंग ठराव मांडलेला असल्याबाबत बोलण्यास सुरुवात केली. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे. त्यामुळे पुरवणी मागण्यावर चर्चा होणार आहे. राज्यात कोरोना, पुरवणी मागण्यासारखे महत्वाचे विषय असताना इतर गोष्टींवर चर्चा कशाला अन्यथा तुम्ही एकट्यानेच चालवा सभागृह आम्ही जातो घरी असे ते म्हणाले.
त्यावर भुजबळ यांनी काय निर्णय झाला याची माहिती अध्यक्षांना विचारली. त्यावर पुन्हा भाजपाचे सदस्य आक्रमक झाल्याने शिवसेनेचे सदस्यही आक्रमक झाले. त्यामुळे गोंधळ वाढल्याने अखेर सभागृहाचे कामकाज पुन्हा अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले.
सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर भुजबळ यांनी पुन्हा ठरावाचा मुद्दा उपस्थित करत अन्वय नाईक याने आत्महत्या कोणामुळे केली ? यासंदर्भात मला राज्याच्या गृहमंत्र्यांकडून जाणून घ्यायचाय असे सांगत यावर कोणी बोललं पाहिजे की नाही. तुम्हालाही मते मांडण्याचा अधिकार आहे. तुम्हीही बोला. त्यावर भाजपाचे आमदार आशिष शेलार हे आक्रमक होत आता पुन्हा तोच विषय, मग आम्हालाही बोलू द्या अशी मागणी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावर भुजबळ म्हणाले की मी तुम्हाला काय बोललो नाही तुम्ही का चिडताय? त्यावर भाजपाचे सर्व सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अखेर पुन्हा गोंधळ पुन्हा वाढल्याने अखेर अर्ध्या तासासाठी तहकूब केले.