मुंबईः प्रतिनिधी
विनोदी अभिनेता अशी ख्याती असलेल्या वैभव मांगलेने नेहमीच प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं आहे. केवळ विनोदी भूमिका न साकारता विविधांगी व्यक्तिरेखा साकारण्याकडे त्याच नेहमी कल असतो. याच कारणामुळे तो कधी हसवतो तर कधी रडवतो. इतकंच नव्हे तर वैभवचा खलनायकी रंगही प्रेक्षकांनी पाहिला आहे. हाच वैभव आता स्वामीच्या भूमिकेत समोर येत आहे.
देव ही निरंकारी गोष्ट आहे असं एक मत आहे आणि दगडाला मूर्तीचा आकार देऊन त्यामध्ये देव पाहणारी एक दृष्टी आहे. आजच्या युगात जर देव या संकल्पनेशी मानवी मनातील भावना जोडायच्या झाल्या तर देव आणि माणसाची भेट कशी होईल? या भन्नाट फँटसीवर बेतलेली देवा शप्पथ या मालिकेत वैभव स्वामी बनला आहे. या मालिकेत वैभवने साकारलेल्या व्यक्तिरेखेचं नाव स्वामी चैतन्य असं आहे. आजूबाजूला वावरणाऱ्या तसंच राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून समोर येणाऱ्या स्वामींची छबी या व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे. मोठा भक्तसंप्रदाय असणारे चैतन्य स्वामी हे स्वतःला परमेश्वराचा अवतार म्हणवतात. ते त्यांच्या भक्तांना चमत्कार करून भारावून टाकतात, कधी त्यांच्या मठात कृष्णलीला रचतात, तर कधी कुठे देवाच्या देवळात जाऊन दर्शन घेता, म्हणून त्या देवाचं दर्शन त्यांच्या आश्रमातच घडवतात. चैतन्य स्वामींना या मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या श्लोकच्या चॅटवेलची मदत घेऊन आणखी मोठा ब्रॅण्ड बनायचं आहे. पण श्लोकचा त्यांना विरोध आहे. श्लोक आणि चैतन्य स्वामीं मधला संघर्ष येत्या काळात पराकोटीला जाणार आहे. चैतन्य स्वामी विषयी खुद्द देवाचं म्हणजे क्रिशचं काय भाष्य असेल. श्रध्दा, अंधश्रध्दा आणि नास्तिकता यांचा संघर्ष येत्या काळात या मालिकेतील रंजकता वाढवणार आहे.