मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज मंत्रालयाजवळ असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळयासमोर तोंडाला काळी फित बांधून मौनव्रत घेत धरणे आंदोलन करण्यात आले.
महात्मा गांधीजींची तत्वे आणि सत्ताधारी भाजप सरकारची आत्ताची तत्वे या फलकासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राबवण्यात आलेल्या जवाब दो मोहिमेतील प्रश्नांचे फलकही याठिकाणी लक्ष वेधून घेत होते.
सुरुवातीला महात्मा गांधींजींच्या पुतळयाला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. ९ ते १२ वाजेपर्यंत धरणे आणि मौनव्रत आंदोलन केल्यानंतर माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रींजींच्या पुतळयालाही पक्षाच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली.
केंद्र व राज्यसरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक,सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन करण्यात आले.
यावेळी मंत्रालयाजवळ असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळयासमोर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विक्रम काळे, आमदार विदयाताई चव्हाण आदी नेत्यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली तोंडाला काळी फित बांधून सरकारचा निषेध म्हणून मौनव्रत धारण करत आंदोलन करण्यात आले. सुरुवातीला खासदार सुप्रिया सुळे यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी पुणे शहर अध्यक्ष चेतन तुपे, खासदार वंदना चव्हाण, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, महिला पुणे शहर अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.