मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल २०२१ रोजीपासून ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले. तरीही राज्यातील कोरोनाच्या संख्येत सातत्याने वाढच होत असल्याचे दिसत असल्याने पुन्हा एकदा १५ दिवसांसाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार १ मे पासून १५ मे सकाळी ७ वाजे पर्यंत हे कडक निर्बंध राज्यात लागू राहणार आहेत.
ब्रेक द चेन अंतर्गत सध्या लागू असलेल्या सवलती तशाच पुढे कायम लागू राहणार असून निर्बंधही तशाच लागू राहणार आहेत. याशिवाय सध्याच्या सवलतींमधील काही सवलती पुन्हा आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र सध्या तरी विद्यमान सवलती कायम राहणार आहेत.
काय आहेत विद्यमान सवलती आणि निर्बंध
नियमावलीनुसार १५ मेपर्यंतच्या लॉकडाऊन काळात मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलीय. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असेल. तसेच सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक दुकाने सुरु राहणार.
यापूर्वी लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती १०० वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकंच नव्हे, तर अवघ्या २ तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावे लागणार आहेत. या नियमांचं पालन झालं नाही तर तब्बल ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार.
१ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन
2. १५ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन
3. सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद
4. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद
5. राज्यात जिल्हा बंदी लागू
6. अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद
7. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी
8. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी
9. सार्वजनिक वाहतूक ५०% क्षमतेनं चालणार
10. एसटी बस वाहतूक ५०% क्षमतेनं सुरू राहणार
11. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा
12. खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास १० हजार दंड