Breaking News

अजित पवार यांच्या भाषणाला परवानगी नाकारल्यानंतर देहू संस्थानचे अध्यक्ष म्हणाले… आम्हाला दिल्लीवरून फक्त नावे विचारण्यात आली

देहू येथील जगद्गुरू संत तुकारामम हाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मंचावर उपस्थित नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंचावर उपस्थित असूनही त्यांना भाषण करू दिलं नाही. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मंचावरून आयोजकांना अजित पवार यांच्या भाषणाबद्दल विचारणा केली. मात्र त्यांनी याबाबत काहीच खुलासा केला नाही. यावरून राज्यातील राजकारण भलतचं तापलं असून याप्रकरणावरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी देवस्थानची भूमिका स्पष्ट केली.

भाषणाबाबत मला देखील कोणतीच कल्पना नव्हती. दिल्लीमध्ये भाषण कोणाचे होणार हे प्रोटोकॉलनुसार ठरलं होतं. मात्र वारकरी संप्रदायच्या कार्यक्रमात कोणतंही राजकारण येऊ नये असं मला वाटतं, अशी सावध प्रतिक्रिया देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली.

त्याचबरोबर या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित राहणार याची माहिती आम्हाला दिल्लीवरून विचारण्यात आली होती. त्यानुसार आम्ही नावं दिली. मात्र त्यात काय ठरवले गेले याची आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार

सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अजित पवार यांना बोलू देण्यात आले नाही हे समजताच ट्वीट करत नाराजी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू येथील कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना बोलू दिले नाही यावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या घटनेवरून टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *