मुंबई: प्रतिनिधी
राज्यात मोफत लसीकरणाची मोहिम १ मे महाराष्ट्र दिनी जरी होणार नसली तरी पुढील सहा महिन्यात ५ कोटी ७१ लाख नागरीकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटी लसींची आवश्यकता असून त्यासाठी ६ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारने केली असून ऑगस्ट महिन्यात जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायडस कॅडिला या दोन परदेशी लसी राज्याला मिळणार तर स्पुतनिकबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
या कंपन्यांच्या लस मिळणार
कोव्हॅक्सि उत्पादक कंपन्यांकडून या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात प्रत्येकी १० लाख डोस मिळणार आहे. जुलैनंतर ते २० लाख डोस देणार आहेत. कोविशिल्डचे प्रत्येक महिन्याला १ कोटी डोस मिळणार आहे. कंपनीने तसं तोंडी आश्वासन दिलं आहे. तसेच रशियाची लस योग्य दरात आणि मुबलक प्रमाणात घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच ऑगस्ट दरम्यान झायडस कॅडिला आणि जॉन्सन अँड जॉन्सनकडून पुरवठा होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
लसीकरण करण्यासाठी कोविन अॅपवरून अपॉईंटमेंट घेणं कंपल्सरी आहे. त्याशिवाय लस मिळणार नाही. उठून कोणीही लसीकरणासाठी येईल असं होणार नाही. त्यासाठी कोविन अॅपवर तुम्हाला नोंदणी करावीच लागेल. केंद्र सरकारचे तसे आदेशच आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर कुणीही गर्दी करू नये, असेही ते म्हणाले.
२ कोटी डोस विकत घ्यावे लागणार
राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात ५ कोटी ७१ लाख लोक १८ ते ४४ वयोगटातील आहेत. त्यांना मोफत लस देण्यात येणार आहे. शंभर टक्के लोकांना फ्रि लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याला दोन कोटी डोस विकत घ्यावे लागणार आहेत. एका लसीसाठी ४०० रुपये आकारले जातात. त्यानुसार २ कोटी डोससाठी अंदाजे ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सहा महिन्यात लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यात लसीकरण करायचे म्हटलं तर १२ कोटी डोस द्यावे लागतील. म्हणजे दर महिन्याला २ कोटी डोस द्यावे लागणार आहेत. आमच्या आरोग्य विभागाच्या १३ हजार संस्था असून त्यांच्या माध्यमामधून दिवसाला १३ लाख डोस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याला दिवसाला ८ लाख डोसची गरज आहे. मात्र सध्या राज्याला १ लाख डोस मिळत आहेत. त्यामुळे सर्वांचंच लसीकरण होणं शक्य नाही, असं सांगतानाच राज्याकडे फक्त दीड लाख व्हॅक्सीन असल्याचेही त्यांनी सांगितलं. यावेळी टोपे यांनी ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरूच राहील असं स्पष्ट केलं. या लसीकरणात कोणतीही बाधा येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.