नागपूर : प्रतिनिधी
निवडणूकीच्या कालवाधीत टोल मुक्त महाराष्ट्राची घोषणा भाजपने केली होती. या घोषणेनुसार राज्यातील लहान वाहनांबरोबरच मोठ्या वाहनांनाही टोल मुक्ती कधी देणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना राज्याला टोलमुक्त करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्रात ३० हजार कोटी रूपये खर्चुन १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधणार असल्याची माहीती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
विधानसभेत ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील बाह्यवळण रस्त्याच्या दुरावस्थेबाबत विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान उपस्थित करण्यात आला. त्यावेळी भाजपचे एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि पांडूरंग बरोरा यांनी उपप्रश्न उपस्थित केले. त्यास उत्तर देताना मंत्री पाटील यांनी वरील उत्तर दिले.
राज्याला टोल मुक्त करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकार काही नव्याने धोरण ठरविणार का? की आहे तेच धोरण सुरु ठेवणार ? असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला. याप्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले की, महाराष्ट्राला टोल मुक्त करण्याच्यादृष्टीने लहान वाहनांना टोलमाफी देण्यात आलेली आहे. तसेच फक्त मोठ्या वाहनांना टोल आकारण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील सर्व वाहनांना टोल माफी देण्यासाठी नव्याने रस्ते बांधण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सद्यपरिस्थितीत ३० हजार कोटी रूपयांच्या खर्चातून १० हजार कि.मीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. तसेच यासंदर्भात लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.