मुंबई : प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनत चालली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी या परिस्थितीला कंटाळून आत्महत्येचा पर्याय निवडत असल्याने यात हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या पगारी देण्याबाबत तात्काळ मार्ग काढावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली.
आतापर्यत अहमदपूर, साक्री, तेल्हारा, शहादा आणि कंधार येथे एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वीही जळगांव येथे वाहक मनोज चौधरी आणि रत्नागिरी येथे पांडुरंग गडदे या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची आठवण फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना करून देत यासंदर्भात पत्र व्यवहार केल्याचे निदर्शनास आणून दिली.
त्यानंतरही आत्महत्येचे सत्र राहीले असून धुळे येथील साक्रीतील बेडसे या एसटी कर्मचाऱ्याने तर वेतन मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठीच लिहून आत्महत्या केली. तरीही परिस्थिती नीट न हाताळता संताप व्यक्त करणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हे नोंदविल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा दिला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या या व्यथांकडे तातडीने हस्तक्षेप करत आपण लक्ष द्यावे आणि वेतन प्रश्नी तोडगा काढत एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्याना या पत्राद्वारे केली.