मुंबई: प्रतिनिधी
राज्यात एकूण ३१२ वाघ असून त्यापैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १६० वाघांचे अस्तित्व आहे. त्यातच येत्या वर्षभरात या परिसरात आणखी ६० नवीन वाघाच्या बछड्यांची भर पडणारआहे. त्यावर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील ५० वाघांना राज्यातील इतर जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
यासंदर्भात नुकतीच नागपूर येथे बैठक झाली. त्यावेळी यासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर शहरापासून केवळ पाच किलोमीटरच्या परिघामध्ये २१ वाघांचा संचार आहे. त्यामुळे याठिकाणी वन्यजीव- मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात दिसून येतो. राज्यातील वन्यजीव – मानव संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवीन धोरण आणणार असल्याचे सांगत वन्यजीव – मानव संघर्ष कमी करणे तसेच राज्यातील काही वाघांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण या दोन्ही बाबींवर उपाययोजना सुचविण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रधान मुख्य वन संरक्षक काकोडकर व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री राठोड म्हणाले, १ जानेवारी २०२० ते २० मे २०२० या कालावधीत राज्यात झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघांच्या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला तर एका अन्य वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा अशा एकूण १३ जणांचा मृत्यू झालेला आहे. तसेच काही ठिकाणी माणसांच्या हल्ल्यामध्ये किंवा इलेक्ट्रिक तारेचा स्पर्श झाल्यामुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वन्यजीव – मानव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
वाघांना स्थांनातरीत करण्यात येणाऱ्या त्या जंगलामध्ये सर्वप्रथम तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवावी लागेल याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. वन्यजीव – मानव संघर्ष कमी करणे आणि वाघांच्या स्थानांतरण संदर्भात राज्य वन्यजीव मंडळासमोर लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि धोरण निश्चित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
Tags chandrapur nagpur sanjay rathod tadoba tigar population rises
Check Also
लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण
येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ …