मुंबई: प्रतिनिधी
राज्यात अनेक मंदिर आहेत. मात्र या मंदिरावर फक्त पुजाऱ्यांची उपजिविका अवलंबून नाही तर मंदिरावर अवलंबून असलेले गुरव आणि त्याच्याशी निगडीत असलेली तेथील गावाची किंवा छोट्या व्यापाऱ्यांची अर्थ व्यवस्था अवलंबून आहे. त्याचबरोबर अनलॉकच्या नावाखाली जनजीवन सुरळित करण्याचे प्रयत्न सुरु असताना सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे असा सवाल करत मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा असे आवाहन करत जर सकारात्मक पाऊल नाही उचलले तर सगळे आदेश झुगारून मंदिर प्रवेश करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला.
सध्या राज्यातील धार्मिक स्थळे आणि मंदिरे उघडण्यावरून सुरु असलेल्या राजकिय धांदलीत आता राज ठाकरे यांनी उडी घेतल्याने मंदिर उघडली जाणार का ? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
मध्यंतरी त्र्यंबकेश्वर मंदीराचे पुजारी आले होते. तेथील गावाची अर्थव्यवस्था ही मंदीरावर अवलंबून आहे. मात्र मंदिरे बंद राहिल्याने ही अर्थव्यवस्थाच कोलमडून पडणार असेल त्यांनी साकडे कोणाला घालावे असा सवाल करत त्यांना मंदिर उघडी हवीत ती या अस्मानी आणि सुलतानी संकटातून बाहेर काढण्यासाठी देवाला साकडे घालायचेय त्याकरिता मंदिरे उघडली गेली पाहिजे अस त्यांनी सरकारला सांगितले.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद होते. तेव्हा मंदिर बंदही ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याचे आम्हीही स्वागत केले. पण सर्व सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना फक्त महाराष्ट्रातच मंदिरे बंद का ? असा सवालही त्यांनी यावेळी सरकारला विचारला.