Breaking News

‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’ म्हणत भाजपाचा घंटानाद परवानगी न दिल्यास मंदिरे उघडू - भाजपाचा राज्य सरकारला इशारा

मुंबई: प्रतिनिधी

राज्यभरातील  मंदिरे  उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी शनिवारी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर हजारो मंदिरांबाहेर करण्यात आलेल्या दार उघड उद्धवा या घंटानाद आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मॉल, बाजारपेठा , दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देणाऱ्या आघाडी सरकारने मंदिरे उघडण्याची परवानगी न दिल्यास प्रार्थनास्थळे नाईलाजाने उघडू , असा इशारा या आंदोलनावेळी देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे , सुधीर मुनगंटीवार, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे , अध्यात्मिक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले, , पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसह विविध धार्मिक संघटना, वारकरी संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते.

सांगली येथे पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की , देशातल्या अनेक राज्यांनी धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने अद्याप अशी परवानगी दिलेली नाही. सर्व नियम व बंधने पाळून मंदिरे उघडण्याची परवानगी राज्य सरकारने त्वरित द्यावी. सध्याच्या काळात सामान्य माणसाला देवाचा,मंदिरांचा मोठा मानसिक  आधार मिळू शकतो.

मिरज येथे आंदोलनात सहभागी झालेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, मॉल, बाजारपेठा , दारूची दुकाने सुरु करणाऱ्या राज्य सरकारला मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी वाटत नाही , हे दुर्दैवी आहे. त्यामुळेच या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी भाजपातर्फे राज्यभर १० हजार मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर, श्रीक्षेत्र देहू, नाशिक येथील रामकुंड, पुण्यात सारसबाग गणपती , कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिर, शिर्डि येथील साई मंदिर येथे हे आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय वारकरी मंडळ, वारकरी महामंडळ, अखिल भारतीय पुरोहित संघ, जय बाबाजी भक्त परिवार यांसह वारकरी, महानुभाव, लिंगायत, जैन, शीख संप्रदायाच्या अनेक संप्रदायांची प्रमुख मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरे-स्थानक, बौद्ध विहार यांच्या प्रवेशद्वारांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत ४ जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले; त्यानुसार देशभरातील बहुसंख्य व प्रमुख देवस्थाने सुरू देखील करण्यात आली आहेत. मात्र महाराष्ट्रात देवस्थाने सुरु करण्याबाबत नाकर्त्या सरकारने आजतागायत निर्णय घेतला नाही. अखेर राज्यभर “दार उघड उद्धवा दार उघड” अशी आरोळी ठोकत भाजपातर्फे “घंटानाद आंदोलन” करण्यात आले. राज्यशासन ठरवेल ते सर्व नियम मान्य करून देवस्थाने आणि भजन, पूजन कीर्तन सुरू करावे अशी एकमुखाने मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाची दखल घेऊन त्वरित यासंदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा आम्हीच प्रार्थनास्थळे उघडू असा इशारा देण्यात आला. ‘दार उघड उद्धवा दार उघड’, ‘दारू नको भक्तीचे दार उघड’, ‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’, ‘भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल’, अशा घोषणांनी राज्यभरातील प्रार्थनास्थळांचे परिसर दुमदुमून गेले होते.

कोरोनाचे संकट लक्षात घेता फेस मास्क्स, डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून हे आंदोलन करण्यात आले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *