मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील प्रत्येक घराघरात स्वच्छतेचे महत्व पटावे म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिन स्वच्छता दिवस म्हणून पाळण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. परंतु मंत्रालयातील स्त्री-पुरूष स्वच्छतागृहांची स्वच्छता राखण्यासाठी भाजपच्या लाडावलेल्या आमदाराच्या कंपनीला काम देवूनही स्वच्छतेचीच दुरावस्था झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
संपूर्ण राज्याचा कारभार मंत्रालयातून चालविला जातो. तसेच लोकोपयोगी अनेक अशा कल्याणकारी योजना जाहीर आणि राबविण्याचे कामही याच मंत्रालयातून होते. परंतु याच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी आणि येणाऱ्या नागरीकांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. मंत्रालयातील तिसरा मजला, दुसरा मजल्यावरील शौचालयांची दारेच गायब आहेत. तर ५ आणि ६ मजल्यावरील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याच्या गळतीमुळे सतत ओलावा राहून येणारे-जाणारी माणसे घसरून पडण्याची शक्यता आहे. तसेच स्वच्छतागृहांमधील घाणेरडा वास बाहेर पडावा याकरिता कोणत्याही पध्दतीची यंत्रणा बसविण्यात आली नसल्याने या दोन्ही मजल्यावरील स्वच्छतागृहांमध्ये सतत घाणेरड्या वासेचा सुगंध दरवळत राहतो.
स्त्रीयांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांमध्येही फारशी स्वच्छता राखली जात नसल्याने तेथेही घाणींचे आणि घाणेरड्या वासांचे साम्राज्य कायम रहात असल्याचे मंत्रालयातील काही महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले. अनेक स्वच्छतागृहांमधील नळ बंद आहेत. तर काही नळांमधून सतत पाणी टिपकत राहते. त्यामुळे ही स्वच्छतागृहे मलेरिया व डेंग्यूंच्या मच्छरांचे आगार बनत आहेत.
विशेष म्हणजे मंत्रालयाच्या पुर्ननिर्माण आणि सुशोभिकरणावर राज्य सरकारने कोट्यावधीचा खर्च केला. तसेच मंत्रालयातील स्वच्छता अती छान रहावी यासाठी एका कंपनीचे काम काढून ते भाजपच्या लाडावलेल्या आमदाराच्या क्रिस्टल या कंपनीला देण्यात आले. मात्र या कंपनीकडून स्वच्छतेच्या बाबत म्हणावी तशी काळजी घेण्यात येण्यात येत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेला स्वच्छतेप्रती उपदेशाचे डोस पाजत त्यावर कोट्यावधी रूपयांचा खर्च करत आहे. परंतु मंत्रालयातच स्वच्छतेची ऐसीतैसी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.