मुंबई : प्रतिनिधी
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी निधनावर काही मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला पण ते कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत. मुंबई पोलीस व कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर शंका उपस्थित करत एम्सकडे ते तपासासाठी पाठवण्यात आले पण सुशांतने आत्महत्याच केल्याचा अहवाल एम्सच्या पॅनलनेही दिला. या अहवालाला एक महिना लोटला तरी सीबीआयकडून काहीच हालचाल झालेली नाही, कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आले नाही. यावर, ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.
सीबीआय बिहार विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करत आहे ? का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवडणुका होईपर्यंत काही हालचाल करु नका, असे आदेश सीबीआयला दिले आहेत. सुशांत प्रकरणात राजकारण केले जात असून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे, हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने केला यावर सुप्रिम कोर्टने शिक्कामोर्तब केले होते. कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालाचीच पुष्टी एम्सच्या पॅनलनेही केली आणि सुशांतसिंहने आत्महत्या केल्याचे सिद्ध झाल्याने ‘मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा भाजपा तोंडावर आपटल्याची टीका त्यांनी केली.
सुशांतसिंहच्या मृत्यूचे गलिच्छ राजकारण करत मुंबई पोलीस व महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र होते. त्यासाठीच सीबीआयसह तीन तीन केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय वापर केला हे आता सिद्ध झाले आहे. त्यांचा कुटील डाव त्यांच्यावर उलटल्याने सीबीआयला गप्प राहण्यास सांगितले असावे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
Tags bjp cbi congress late sushant singh rajput sachin sawant
Check Also
प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …