Breaking News

भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भाजपावर हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी

भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजपवर शरसंधान साधले. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र बंदला भाजपाने विरोध दर्शवित शेतकऱ्यांना चिरडून मारण्याच्या गोष्टीचे अप्रत्यक्ष असमर्थन करत असल्याचा आरोप केला.

आज लखीमपूर हत्याकांड प्रकरणी निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ चे आवाहन केले होते. त्यानुसार हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्यावतीने मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांनी पहिल्यांदा तो व्हिडीओ बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का? त्यात क्रुरता दिसतेय असे सांगतानाच पहिले आपण माणसं आहोत ना असा सवालही त्यांनी केला.

सरकार कुणाचंही असो ही जी कृती झाली ती चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जनतेला व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं भाजपकडून अप्रत्यक्ष समर्थन – जयंत पाटील

भाजपकडून या बंदला विरोध म्हणजे शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

लखीमपूरमधील हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला.

भाजपाच्या मंत्र्यांच्या चिरंजीवाने हे हत्याकांड केलंय. अद्यापही त्याला अटक होत नाही, त्याला सन्मानाने बोलावलं जातं. भाजपाला शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचं काम करायचं आहे. त्याचा निषेध म्हणून मविआच्या सर्वच पक्षांनी हा बंद पुकारला आहे. सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही. भाजपने केलेल्या या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *