मुंबई : प्रतिनिधी
मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या दृष्टीने हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी १८ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय ऐवजी लेखानुदान अधिवेशन घेण्याचे जाहीर केले होते. मात्र आता सरकारने अधिवेशन १८ फेब्रुवारी ऐवजी २५ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तशी राज्यपालांना विनंती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
राजधानी दिल्लीतही हिवाळी अधिवेशन सुरु असून मार्च महिन्यात लोकसभेच्या निवडणूकीची आचार संहिता लागण्याआधी लेखानुदान अधिवेशन होणार आहे. त्या अधिवेशनाच्या बरोबरच राज्यातले अधिवेशन व्हावे या पार्श्वभूमीवर अधिवेशनाची तारीख सात दिवसांनी पुढे ढकलल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
केंद्र सरकारचे अधिवेशन १८ फेब्रुवारीच्या आधी होईल अशी शक्यता होती. मात्र ते अधिवेशन पुढे जाण्याची शक्यता असल्याने २५ फेब्रवारीला अधिवेशन घेण्याची विनंती राज्यपाल विद्यासागर राव यांना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनातही सरकारने पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. केवळ नऊ दिवसांचा कालावधी हिवाळी अधिवेशनासाठी देण्यात आला. आताही सरकार लेखानुदानाच्या निमित्तांने अधिवेशनाच्या तारखांत बदल करून वेळ काढण्याच्या तयारीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.