मुंबई-चंद्रपूर: प्रतिनिधी
राज्यातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्याबरोबरच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेत कपात करण्यात आली. या कपातीच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला धन्यवाद देत नक्षलवाद संपलेला दिसतोय असा उपरोधिक टोला लगावला.
विशेष म्हणजे भाजपाकडून सुरक्षा कपातीच्या निर्णयावर टीका करताना फक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्याच नावाचा उल्लेख केला. या नेत्यांमध्ये नक्षलग्रस्त भागातील आमदार तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा उल्लेख करण्याचे टाळले. यावरून मुनगंटीवारांना भाजपा आजही नेता मानत नाही की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या भूमिकेची वाट न पाहता सरकारला उपरोधिक धन्यवाद देत पुढे म्हणाले की, आपण माझी सुरक्षा काढली, नक्षलग्रस्त जिल्हात असल्यामुळे ही सुरक्षा देण्यात आली होती. पण आता नक्षलवाद संपलेला दिसतोय. आमची सुरक्षा काढली असली तरीही जनतेच्या हिताच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज आणखी धारदार होईल असा इशारा दिला.