मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्याचे महत्वाचे वैधानिक विकास महामंडळ असलेल्या मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची मुदत संपलेली असून ते महामंडळ पुन्हा कधी तयार करणार अशी विचारणा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी करत कोण आहे तो झारीतील शुक्राचार्य जो प्रस्ताव रोखत असल्याचा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांना उपप्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यावर आम्ही महामंडळ करायला तयार आहोत मात्र ते जे वरिष्ठ आहेत त्यांनी त्यात बदल करू नये अशी जबाबदारी तुम्ही घ्यावी असे उत्तर राज्यपालांना उद्देशून देत राज्य सरकार विरूध्द राज्यपाल असा संघर्ष अद्याप सुरु असल्याचे अप्रत्यक्ष स्पष्ट केले.
मराठवाडा-विदर्भ विकास महामंडळाची मुदत एप्रिल महिन्यात संपली. मात्र या महामंडळावर पुन्हा नव्याने नियुक्त्या करण्यात न आल्याने या भागाचा विकास कसा व्हायचा १० हजार कोटी रूपयांचा निधी वाया जाईल अशी भीती मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
तसेच तुम्ही या महामंडळाच्या निर्मितीसाठी तयार आहात. मंत्रिमंडळात तीनवेळा याविषयीचा प्रस्ताव आला. परंतु त्यास मान्यता मिळाली नसल्याची माहिती असल्याचे ते म्हणाले.
त्यावर अजित पवार यांनी आम्ही महामंडळ करायला तयार आहोत. मात्र त्यात वरिष्ठांनी अर्थात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बदल करायला नको असे सूचक विधान करत याची जबाबदारी घ्या अशी सूचना केली. तसेच यासंबधीच्या काही गोष्टी तुम्हाला खाजगीत दाखवेन असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
यावरून राज्य सरकारच्या अनेक निर्णय प्रक्रियेत राज्यपाल कोश्यारी हे हस्तक्षेप करत असल्याची बाब दिसून येत असून या राज्यपाल विरूध्द राज्य सरकार असा संघर्ष अद्यापही सुरुच असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच अजित पवारांच्या वक्तव्यांमुळे तर त्यास पुष्टीच मिळत आहे.