मराठी ई-बातम्या टीम
२०२१ वर्ष संपायला काही तासांचा अवधी शिल्लक असून त्यानंतर २०२२ या नव्या वर्षाचा प्रारंभ होत आहे. या सबंध वर्षभरात देशातील समाज जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या गोष्टींनी प्रभाव टाकला त्याचा हा छोटासा आढावा घेण्याचा प्रयत्न.
शेतकरी:-
तसं पाहिलं तर देशाच्या राजकारणात आणि अर्थकारणात कृषी क्षेत्राचा उल्लेख केला जातो. मात्र त्या कृषी क्षेत्रातील महत्वाचा घटक असलेल्या शेतकऱ्याच्या कामाचा उल्लेख फारसा कुठे केला जात नाही. देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी म्हणून मोदी सरकारने तीन कृषी कायदे संसदेत कोणत्याही चर्चेविना मंजूर करत त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले. या तीन कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यातील शेतकऱ्यांनी आवाज उठवित दिल्लीत आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाला देशभरातील सर्वच शेतकऱ्यांनी पाठिंबा देत प्रत्येक राज्यात आणि दिल्लीत जावून आंदोलन केले. ऊन, वारा, पाऊस या तिन्ही ऋतुमध्ये आणि पोलिस-प्रशासन आणि सरकारच्या दुर्लक्ष असूनही आतापर्यंतचे सर्वाधिक काळ चालणारे अर्थात १४ महिने आंदोलन सुरू होते. या आंदोलनात जवळपास ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तरीही आंदोलन सुरूच राहीले. अखेर या आंदोलनापुढे झुकत मोदी सरकारने ते तीन कृषी कायदे मागे घेतले. त्यामुळे नियुज ऑफ द इयर यामध्ये पहिला मान शेतकऱ्यांना जातो.
कोविड आणि ओमायक्रॉन:-
कोविड संसर्गाची सुरुवात २०१९ झाली. त्यामुळे २०१९ आणि २०२१ पर्यत जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु मागील वर्षभरात तसं पाहिलं तर कोविडची लाट ओसरण्यास सुरुवात झाली २०२१ च्या मध्यापासून. त्यामुळे भारतासह जगभरात जेवढी काही निर्बंध लागू करण्यात आली होती. ती सर्व निर्बंध-बंधने हळूहळू कमी करत जनतेला निर्बंध मुक्त जगण्यासाठी प्रवृत करण्यात येवू लागले. परंतु त्यास काही महिन्याचा अवधी लोटत नाही तोच दक्षिण आफ्रिका खंडातील न्युझिलंड येथे कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला तो म्हणजे ओमायक्रॉन. या ओमायक्रॉन व्हेरिएंटने अल्पावधीतच जगभरात पसरण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याच्या प्रसाराचा वेग आणि संसर्गाचा वेग पाहुन भले भले शास्त्रज्ञ अंचबित झाले असून युरोप, अमेरिकेत या विषाणूमुळे बाधित होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे इतर विकसनशील देशामध्ये भीताचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर पर्यायी मात्रा म्हणून आता बुस्टर डोसची मात्रा देण्याचा निर्धार सर्वच देशांनी आणि संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संघटनेनेही केला आहे. वर्ष संपता संपता पुन्हा ओमायक्रॉनचा धोका वाढल्याने आता नव्याने निर्बंध लागू होत आहेत.
अदार पुनावाला-कोविशिल्ड लसमात्रा
सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदार पुनावाला यांनी ऑक्सफर्ड युनिव्हरसिटीने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीची निर्मिती करत त्यांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. काही देशांनी विशेषत: भारताने आणि इंग्लडने या लसीला लगेच मान्यता दिली. परंतु सुरुवातीला अनेक राष्ट्रांनी त्यास मान्यता देण्यास नकार दिला. परंतु त्यानंतर त्यांनी हळू हळू मान्यता देण्यास सुरुवात केली. या लसीच्या निर्मिती आणि पुरवठ्यामुळे अदार पुनावाला यांचे आणि सीरम इस्टीस्टुटचे नाव चांगलेच चर्चेत राहीले.
मुख्यमंत्री योगी आदीत्य नाथ, उत्तर प्रदेश:-
भारताली सर्वाधिक क्षेत्रफळाचे आणि लोकसंख्येची ओळख असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यापासून वास्तविक पाहता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चर्चेत आहेत. मात्र या वर्षी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांनी राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे कायदे करणे, हिंदूत्ववादी विचारांचा पाठबळ मिळेल अशी गोष्टी वक्तव्य करणे, तेथील आरोग्य विभागाकडे सक्षमीकरणाकडे लक्ष न दिल्याने तेथील २२ बालकांचा मृत्यू होणे, विकासकामे आपल्याच सरकारने केल्याचा दावा करत कोलकाता येथील उड्डाणपूल उत्तर प्रदेशमध्ये बांधल्याचा दावा करत त्याच्या जाहीराती करणे, राम मंदीर, काशी विश्वनाथ मंदीराचा जीर्णोद्धार यासह अनेक गोष्टींमुळे योगी आदित्यनाथ चर्चेत राहीले.
नवज्योतसिंग सिध्दू-काँग्रेस नेता
भाजपाला रामराम करून काँग्रेसमध्ये आलेले नवज्योतसिंग सिध्दू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंग यांच्या विरोधात आघाडी उघडत त्यांना पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. तसेच प्रदेशाध्यक्ष पदी स्वत:ची वर्णी लावून घेतली. परंतु त्यांना स्वत:ला मुख्यमंत्री म्हणून बसता आले नाही. प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती आल्यानंतर आणि कॅ.अमरिंदर सिंग यांना काँग्रेसबाहेर घालविल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत दिल्लीतील काँग्रेसश्रेष्ठींवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी असलेल्या त्यांच्या मित्रत्वाच्या संबधामुळे ते चर्चेत आले.
जी झिंगपिंग:-
चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि तेथील कम्युनिस्ट पार्टीचे सर्वेसर्वा असलेले जी झिंगपींग हे ही यावर्षी सर्वाधिक काळ चर्चेत राहीले. भारत- चीन दरम्यान असलेल्या सीमेवर चीनी सैन्याकडून वारंवार भारतीय हद्दीत प्रवेश करण्यात येत होता. तसेच अनेक भागात चीनने घुसखोरी करत तेथील सैनिकांसाठी घरेही उभारली. याशिवाय तैवान देश हा चीनचाच भू भाग असल्याचे सांगत तैवानला स्वतंत्र राष्ट्राची मान्यता न देण्याची भूमिका घेतली. त्याशिवाय तसा दबाब आंतरराष्ट्रीयस्तरावरील इतर राष्ट्रांवर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नीरज चोप्रा:-
नुकत्याच झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देण्यात भाला फेक पटू नीरज चोप्रा याचा सिंहाचा वाटा आहे. यापूर्वी जवळपासून १२५ वर्षापूर्वी ब्रिटीशांच्या या एका अधिकाऱ्याने भारताच्यावतीने भालाफेक क्रिडा प्रकारात भाग घेतला होता. त्यावेळी त्याला सुवर्ण पदक मिळाले होते. त्यानंतर पहिल्यांदाच या क्रिडा प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळाले. त्यामुळे भालाफेक पटू नीरज चोप्रा हा चर्चत राहीला.
जनरल बिपीन रावत सीडीएस:-
देशाचे पहिले सीडीएस असलेले बिपीन रावत यांची नियुक्ती जवळपास याच वर्षाच्या सुरुवातीला झाली होती. परंतु बिपीन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि ११ लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर अपघातात तामीळनाडू येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. देशाचे पहिले सीडीएस आणि त्यांचा अशा पध्दतीचा अपघाती मृत्यू यामुळे सैनाकडे असलेल्या यंत्रसामग्रीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पश्चिम बंगाल,-:
२०२१ च्या सुरुवातीला पश्चिम बंगालच्या निवडणूकां होत होत्या. त्यामुळे येथील तृणमुल काँग्रेसची आणि पर्यायाने ममता बॅनर्जी यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री-कार्यकर्त्ये पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून होते. परंतु ममता बॅनर्जी यांनी एकहाती तृणमुल काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात यश मिळविले. त्यांच्या या विजयामुळे त्या राष्ट्रीय पातळीवर एकदम प्रकाशझोतात आल्या आणि मोदी-भाजपाला सशक्य पर्याय म्हणून त्यांची प्रतिमा काही काळ निर्माण झाली. त्यातच त्यांनी नुकत्याच मुंबईच्या दौऱ्यावर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांचीही भेट घेतली.
आर्यन खान-समीर वानखेडे-नवाब मलिक:-
यावर्षात बॉलिवूड स्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्जप्रकरणी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अटक केली. या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एकएक गोष्टींचा भंडाफोड करण्यास सुरुवात केली. त्यानुळे एनसीबीच्या कारवायांबाबत पहिल्यांदाच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तसेच या प्रकरणाच्या निमित्ताने पहिल्यांदाच केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याबाबतचा मुद्दाही चर्चेत आला.
परमबीर सिंग-अनिल देशमुख:-
मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्याच विभागाचे प्रमुख गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपयांची खंडणी वसुली करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यामुळे एका वेगळ्याच वादंगाला तोंड फुटले. सध्या त्या आरोपातील सत्यता पडताळणीचे काम सुरु आहे. परंतु या आरोपामुळे ईडीने कारवाई सुरु करत त्याचा तपास सुरु केला. १०० कोटीबाबत काही मिळाले नाही. परंतु इतर बेनामी व्यवहाराची माहिती मिळाली आणि अनिल देशमुखांना ईडीने ताब्यात घेतले असून सध्या ते तुरुंगात आहेत.
कंगना रानावत:-
आपल्या बेताल वक्तव्यामुळे शेतकऱ्यांना कधी दहशतवादी, तर मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे कंगना राणावत ही नेहमी चर्चेत राहीली.
मुन्नवर फारूखी-:
स्टॅण्ड अप कॉमेडियन मुन्नवर राणा यांच्या बंगरूळू येथील शो ला स्थानिक हिंदूत्वावाद्यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांचे नियोजित तीन-चार शो रद्द करावे लागले. त्यावर त्यांनी अखेर नफरत जीत गई असे ट्विट करत आपण यापुढे शो करणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे नव्याने कलाक्षेत्रात एक वेगळा फॉर्म निर्माण करू पाहणाऱ्या कलाकारांसमोर एक वेगळीच समस्या निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. तसेच राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांवरही कशा प्रकारे गदा आणली जात आहे. यानिमित्ताने पाह्यला मिळाले.
पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती:-
लॉकडाऊन काळानंतर निर्बंध शिथील होवू लागल्यानंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली. या किंमतीने अल्पावधीतच शंबरीपारचा टप्पा गाठला. मात्र याबाबत केंद्र सरकारकडून कोणतेच अधिकृत भाष्य करण्यात आले नाही. यावरून जनतेत रोष निर्माण होताना सुध्दा केंद्र सरकार ढिम्म हलले नाही. अखेर संभावित निवडणूकांच्या दृष्टीने केंद्र सरकारने ५ रूपये कपात करण्याचा निर्णय घेतला.
पर्यावरणातील बदल:-
यंदाच्यावर्षी पर्यावरणातील बदलामुळे देशाच्या अनेक भागात बे-मोसम पाऊस, अरबी समुद्रात चक्रिवादळ निर्माण होणे. अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच पर्यावरणातील बदलाकडे सर्वपक्षियांची आणि जनतेचे लक्ष वेधले गेले.
महिलेच्या नेतृत्वाखाली पहिली युनिकॉर्न कंपनी:-
नायका ही सौदर्य प्रसाधन निर्मितीतील कंपनी आहे. या कंपनीने मंध्यतरी आपल्या कंपनीचे आयपीओ बाजारात आणले. त्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कंपनीच्या मालमत्तेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. या नायका कंपनीच्या प्रमुख या फाल्गुनी नायर आहेत.
पहिला गे जजची नियुक्ती:-
दिल्ली उच्च न्यायालयात लवकरच सौरभ क्रिपाल या गे न्यायाधीशाची नियुक्ती होणार असून त्यांच्या नावाची शिफारस तीन सदस्यांच्या समितीने केली आहे. त्यामुळे २०२२ मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाच्या नियुक्त झाल्याचे चित्र आपल्याला पाह्यला मिळेल.