राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सुरु केलेल्या कारवाईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तसेच त्यासंदर्भातील सुनावणी अद्याप प्रलंबित असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अचानक महाविकास आघाडी सरकारला आपले बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हणाले, मला माझ्या विरोधात मतदान करणाऱ्यांना पहायचंय, अशी माहिती महाविकास आघाडीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पुढील रणनीती ठरविण्याचे बळ आले आहे. तसेच आज राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने धाव घेतल्याने याप्रश्नी न्यायालयाचा अंतिम निकाल काय येतो यावरच महाविकास आघाडीचे भवितव्य ठरणार आहे. मात्र आता विधानसभेत बंडखोर आमदारांना मतदान करताना पाह्यची इच्छा व्यक्त केल्याने विश्वासदर्शक ठरावाला मुख्यमंत्री ठाकरे हे सामोरे जाणार असल्याचे दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बंडखोर आमदारांना परतण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून परत येण्याची आवाहन करत आर्त साद घातली. तरीही बंडखोर आमदारांकडून उध्दव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याऐवजी उलट उध्दव ठाकरेंनाच सवाल करत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेवरून याचा अर्थ काय असा सवाल उपस्थित केला. त्यावर अद्याप उध्दव ठाकरे यांनी अद्याप कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. मात्र काल रात्री विकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक झाली.
याबैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, शिवसेनेच्या प्रत्येक आमदारांना घरातल्या सदस्यासारखे जपले. तरीही या आमदारांना माझ्या विरोधात जाण्याची गरज वाटली हे मला पहायचे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विश्वासदर्शक ठरावावेळी किती बंडखोर आमदार माझ्याच उपस्थितीत माझ्याच विरोधात मतदान करतात ते मला पहायचंय असे ते म्हणाले. तसेच त्या अनुषंगानेच पुढील रणनीती आखावी अशी सूचना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपल्याला पाहून किमान एक तरी आमदार बंडखोरांचा गट सोडून माझ्याकडे येईल अशी आशा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना वाटत असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.