शंकर जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोट निवडणूक जारी झालेली आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने कोल्हापूर उत्तरमध्ये आता काँग्रेस आणि भाजपामध्ये कुरघोड्यांचे राजकारण चांगलेच रंगण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने काँग्रेसचे मंत्री सतेज बंटी पाटील यांच्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीकेची झोड उठवित प्रचाराचा नारळ फोडला. परंतु चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे भवितव्यच आता बंटी पाटील यांच्या हाती असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
चंद्रकांत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ आता जवळपास पूर्ण होत आला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष पदी असूनही त्यांची म्हणावी तशी कामगिरी झालेली नाही. तसेच कार्यकर्त्यांशी असलेला संपर्कही त्यांचा तुटत चालला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भाजपातंर्गत असंतोष वाढीस लागला आहे. त्यातच हल्ली चंद्रकात पाटील आणि फडणवीस यांच्यातील दुरावाही वाढत चालला असल्याची माहिती भाजपातील अंतर्गत विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्यातील अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना प्रश्न केला. त्यावेळी फडणवीस यांनी मध्येच संतापून ही माझी पत्रकार परिषद आहे, मलाच प्रश्न विचारा असे चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सांगत त्यांना बोलू दिले नाही. यावरून आता फडणवीसांनाही चंद्रकांत पाटील नकोसे झाल्याचे निदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यात झालेल्या चर्चेनुसार चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याचा निर्णय जवळपास झाला असून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूर हा चंद्रकांत पाटील यांचा बालेकिल्ला आणि होमटर्फ असल्याचे मानले जात असल्याने आता त्याच जिल्ह्यात पोट निवडणूक जाहीर झाल्याने तेथील भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना निवडूण आणण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या निवडणूकीत जर भाजपा उमेदवाराचा पराभव झाला तर चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून गच्छंती अटळ असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात आगामी मुंबईसह १४ महानगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. तसेच महाविकास आघाडीला सडेतोड पध्दतीने उत्तर देणाऱ्या तगड्या नेत्याची निकड सध्या भाजपाला जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पदी नव्या व्यक्तीची निवड करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा असून हे दोन पक्ष जे ठरवतील तेच आतापर्यंत होत आले आहे. त्यातच मंत्री सतेच बंटी पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकिय शस्त्रुत्वही जगजाहीर आहे. त्यामुळे सतेज बंटी पाटील काँग्रेसच्या जयश्री जाधव यांच्या विजयासाठी जे काही डावपेच खेळतील त्यावर तेथील काँग्रेस उमेदवाराचा जय पराजय ठरणार आहे. तर दुसऱ्याबाजूला चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदी राहणार की जाणार याचा निकालही या जागेच्या निवडणूक निकालावरच अवलंबून राहणार आहे. तसेच आशिष शेलार प्रदेशाध्यक्ष पदी विराजमान व्हावे यासाठी मुंबईतील काही उद्योगपती प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags bjp maharashtra president chandrakant patil bjp mla ashish shelar congress minister satej banty patil
Check Also
बिल्कीस बानो: या मुद्यांच्या आधारे न्यायालयाने ठरविला गुजरात सरकारचा निर्णय अवैध
देशातील गोध्रा येथील जातीय दंगली दरम्यान बिल्कीस बानो या मुस्लिम गरोदर महिलेवर बलात्कार करून तिच्या …