आगामी मराठी साहित्य समेंलन उदगीर येथे होत आहे. या साहित्य समेंलनासाठी निधीची आवश्यकता आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा मधील १० आमदारांनी १ कोटी ५५ लाख रूपये देण्याचा निर्णय घेत तसे विनंती पत्र संबधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिले आहे.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे मराठी साहित्य संमेलन होवू शकले नाही. मात्र नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या स्वागताध्यक्षतेखाली पार पडलेल्या साहित्य संमेलनात पुढील साहित्य संमेलन उदगीर या ग्रामीण भागात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता या साहित्य संमेलन तयारी आयोजकांकडून सुरु झाली आहे. या साहित्य संमेलनासाठी दरवर्षी राज्य सरकारकडून ५० लाख ते १ कोटी पर्यतचा निधी दिला जातो. तसेच छोट्या-मोठ्या देणगीदारांकडून दिला जातो.
यावेळी हे साहित्य संमेलन पहिल्यांदाच तालुकास्तरावर आयोजित करण्यात आल्याने येणाऱ्या साहित्य रसिकांसाठी कोणतीही जाणवू नये आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च अपेक्षित आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांनी आपल्या आमदार फंडातून ५ लाख ते २० लाख रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा निधी साहित्य संमेलनासाठी द्यावा असे पत्रही त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिला आहे.
साहित्य संमेलनाला आमदार निधीतून फंड देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे अंबादास दानवे, डॉ.मनिषा कायंदे, दिवाकर रावते, सुनिल शिंदे, भाजपाचे प्रसाद लाड, संजय दौंड, चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण घटके, सुरेश धस तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी या साहित्य संमेलनासाठी आमदार फंडातून निधी दिला.
याशिवाय आणखी काही आमदार या साहित्य संमेलनासाठी न आपल्या आमदार फंडातून निधी देणार असल्याची माहिती मिळत आहे.