हिमाचल प्रदेश पाठोपाठ गुजरात विधानसभा निवडणूकीच्या तारखा आज जाहीर झाल्या. मात्र या दोन राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी रोजगार मेळावा घेत देशभरातील अनेक आधीच निवड झालेल्या बेरोजगार उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. अगदी त्याच पार्श्वभूमीवर राज्यातही शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळावा घेतला. परंतु या मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात परिक्षेच्या माध्यमातून आधीच निवड झालेल्या १७९६ उमेदवारांना आज नियुक्ती पत्रे देण्यात आली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या रोजगाराच्या मुद्यावर श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतलेल्या रोजगार मेळाव्यात अमरावतीतील नियोजन भवनातील १०८ जणांना, नागपूर येथील बचत भवन येथील १९१ जणांना, औरंगाबादेतील नियोजनातील २३८ जणांना,नाशिकमधील नियोजन भवनातील ४५५ जणांना, पुणे येथील नियोजन भवनातील ३१६ असे मिळून १३०८ जणांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आले.
तर मुंबईतील म्हाडा कार्यालयातील ४२१ उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. म्हाडातील रिक्त जागांसदर्भात महाविकास आघाडी सरकारच्या काळात परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल प्रलंबित राहीला होता. दरम्यानच्या काळात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि पुढील प्रक्रिया खोळंबली.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडून निवड करण्यात आलेल्या ६५ जणांनाही आज नियुक्ती पत्रे देण्यात आली. यातील निम्म्याहून अधिक जण हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१९ साली झालेल्या परिक्षेत उत्तीर्ण झालेले, तर काही जण हे न्यायालयीन आदेशान्वये, तर काही जणांची निवड होऊनही त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलेले नव्हते अशांना आज नियुक्ती पत्रे देण्यात आली असून अशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
तसेच परिवहन विभाग आणि उद्योग विभागात यापूर्वीच निवड झालेल्या प्रत्येकी एकासही नियुक्ती पत्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले.
कोणकोणत्या विभागातील उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली त्याची माहिती खालीलप्रमाणेः-