Breaking News

‘डॉक्टर’ बाबासाहेब, संतती नियमन आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था लेखन- डॉ. प्रदीप आवटे

“अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पातील सार्वजानिक आरोग्यावरील तरतूद किती तोकडी आहे ते पहा. एकूण अर्थसंकल्पिय खर्चाच्या अवघी अडीच टक्के! आमची खेडी पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. शेकडो गावांना पाणी पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नाही. आमची खेडी म्हणजे निव्वळ उकीरडे झाले आहेत. त्यांना गाव म्हणणेच चूक आहे.ग्रामीण भागात सांडपाण्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. मलेरियाने, इतर आजारांनी शेकडो लोक मरण पावताहेत. ग्रामीण भागात क्वचितच एखादा दवाखाना दिसतो आहे. औषध वाटपासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी कोठेही कसलीही सुविधा दृष्टोत्पत्तीस येत नाही. पिण्याच्या पाण्याअभावी, वैद्यकीय मदतीअभावी शेकडो लोक मरताहेत.”

दि. २ मार्च १९३८ रोजी त्यावेळच्या मुंबई प्रांताच्या ऍसेम्ब्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले हे भाषण ! बाबासाहेब आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ होते,समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी सार्वजानिक आरोग्याचे सामाजिक प्रगतीतील स्थान नेमके ओळखले होते आणि म्हणूनच सार्वजानिक आरोग्याच्या संदर्भातील आपली भूमिका अधिक विस्ताराने विविध अभ्यासांचे संदर्भ देताना विविध अभ्यासांचे संदर्भ देत ते अनेकवेळा मांडताना दिसतात. देशभरातील दलित पदद्लित जनसमूह हा बाबासाहेबांच्या विचारांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि या जनसमूहाला सुखी समाधानी करण्याची क्षमता असणारा सार्वजानिक आरोग्याचा विषय त्यांच्या जिव्हाळ्याचा होता आणि म्हणूनच या वंचित समाजगटाला सार्वजानिक आरोग्य सुविधा पुरवण्यासंदर्भात ते वेळप्रसंगी आक्रमक होताना दिसतात.

सार्वजानिक आरोग्यासाठीची आर्थिक तरतूद अत्यंत अपुरी आहे, असे आपण विधीमंडळात सांगत असताना अर्थमंत्री मात्र हसताना दिसतात आणि बाबासाहेबांचा राग अनावर होतो, “ माझे सन्माननीय मित्र,मंत्रीमहोदय हसताहेत. त्यांनी हसलेच पाहिजे. ते दुसरं काय करु शकतात?” असे बाबासाहेब संतापाने म्हणतात. त्यावर दुसरा एक सदस्य खोडकरपणे बोलतो, “ मग त्यांनी रडावे का ?”

यावर बाबासाहेब म्हणतात, “ होय त्यांनी रडायला हवे. त्यांना रडताना पहायची माझी इच्छा आहे कारण त्यांचे अश्रू त्यांच्या भावना सांगतील, या प्रश्नाबद्दल असणारी त्यांची सहानुभूती दाखवतील. पण असे संवेदनाशून्य हसू आपणाला कोठे घेऊन जाईल ?”

बाबासाहेबांची ही प्रतिक्रिया त्यांचा सार्वजानिक आरोग्यविषयक जिव्हाळा स्पष्ट करते. या जिव्हाळ्यातूनच सार्वजानिक आरोग्यासंदर्भातील अनेक प्रश्नांवर आपल्याला आजही थक्क करणारी,काळाच्या पुढे जाणारी सुस्पष्ट भूमिका बाबासाहेब घेताना दिसतात.

संततीनियमन हा असाच एक महत्वाचा प्रश्न. आज सहजतेने प्रत्येकाने स्वीकारलेला हा विषय स्वातंत्र्यपूर्व काळातील एक अत्यंत वादग्रस्त विषय होता. १९२० सालापासून र.धों.कर्वे यांनी संतती नियमनाचा प्रचार आपल्याकडे सुरु केला होता खरे;पण रधो अक्षरशः आगीतून चालत होते. १९२१ साली मार्गारेट सॅंगरने ‘अमेरिकन बर्थ कन्ट्रोल लीग’ स्थापन केली होती. १९३५ साली ती भारतात आली होती आणि संततीनियमनासंदर्भात ती म.गांधींना भेटली होती; पण माल्थसपासून म.गांधीजीं पर्यंत सर्वांची भूमिका एकच होती.

संततीनियमनाची आवश्यकता त्यांना मान्य होती ; पण त्यासाठीच्या कृत्रिम उपायांना त्यांचा विरोध होता. आत्मसंयमन हा त्यावरील सर्वोत्तम उपाय वाटत होता. एक किंवा दोन अपत्यप्राप्तीनंतर विवाहांतर्गत ब्रम्हचर्य पाळणे हाच गांधीजींच्या संततीनियमनाचा मार्ग होता. डॉ. आंबेडकरांनी या विषयावर घेतलेली भूमिका गांधी आणि माल्थसच्या भूमिकेपेक्षा अधिक व्यवहार्य आहे. एकमेकांवर प्रेम करणारे दोन तरुण जीव पती-पत्नी या नात्याने एकत्र रहात असताना आत्मसंयम आणि ब्रम्हचर्य या गोष्टी अत्यंत अव्यवहार्य आहेत, असे बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते. सर्वसामान्य माणसं वासनेला बळी पडतात हे उघड्या डोळ्यांना दिसणारे वास्तव नाकारण्यात काय अर्थ ?

१० नोव्हेंबर १९३८ रोजी मुंबई प्रांताच्या विधीमंडळात बाबासाहेबांच्या वतीने संतती नियमनविषक ठराव श्री. पी. जे. रोहम यांनी मांडला. या ठरावात बाबासाहेबांची संततीनियमनविषयक भूमिका सविस्तरपणे येते. या प्रश्नाचा बाबासाहेबांनी सर्व बाजूंनी विचार केला आहे हेही आपल्याला जाणवते. कुटुंब नियोजनाची कृत्रिम साधने वापरणे पाश्चात्य समाजासाठी योग्य आहे;पण आपला समाज हा अध्यात्मिक समाज आहे, त्यामुळे आत्मसंयमन आणि ब्रम्हचर्य यांचे महत्व त्याला उमजते अशी अनेकांची भूमिका होती. मुंबई विधिमंडळातील एक सहकारी श्रीमती सरोजिनी मेहता यांनी वाटलेली पत्रके बाबासाहेब उधृत करतात. ‘ केवळ जग हे माया आहे ही व यासारखी वाक्ये पोपटपंची सारखी म्हटल्याने कोणी अध्यात्मिक होतो का ? असा रास्त प्रश्न विचारुन स्त्री-पुरुष संबंधांतील वास्तव बाबासाहेब मांडतात आणि लोकसंख्या नियंत्रणासाठीची व्यवहार्य भूमिका घेण्याची विनंती करतात.

संतती नियमनाच्या अभावाचे चटके बाबासाहेबांनी स्वतःच्या जीवनात घेतले होते. ते स्वतः त्यांच्या माता-पित्यांचे चौदावे अपत्य होते. कुटुंबाच्या अवाजवी आकारामुळे बसणारे दारिद्र्याचे चटके त्यांनी सोसले होते. मांजरपाटाचे शर्ट, फाटलेला कोट, चपला नसणे, अनेकवेळा खिशात दिडकीही नसणे अशा अवस्थेत त्यांना शिक्षण घ्यावे लागले होते. बाबासाहेबांना स्वतःला पाच मुले झाली होती. त्यातील चार मूत्यू पावली. राजरत्नाच्या वेळी तर बाबासाहेब धाय मोकलून रडले. या पाच बाळंतपणामुळे त्यांच्या प्रिय रमाबाईंची प्रकृती खालावली. त्यातच १९३५ साली त्यांचे निधन झाले. बाबासाहेब अत्यंत हळवे होते. आपल्या मुलांच्या मृत्यूबद्दल त्यांनी लिहिले आहे,– “आमच्या चार लहानग्यांचे अंत्यविधी करण्याचे दुर्दैव आम्हांवर ओढवले या विचारांनीच मला गुदमरायला होते. माझा लहानगा राजरत्न तर फारच गोजिरा होता. त्याच्या जाण्याने माझे आयुष्य काट्याचे बन झाले आहे.”

पण महापुरुष आपली दुःखे कवटाळून बसत नाहीत. समाजाच्या विशाल दुःखाशी त्यांची नाळ जोडतात आणि नव्या परिवर्तनासाठी संघर्षरत होतात.

अतिरेकी जन्मदर हाच आपल्या समाजातील वाढत्या दारिद्र्याचे, बालमृत्यु आणि माता मृत्यूचे कारण आहे हे बाबासाहेबांनी नेमके हेरले होते आणि म्हणूनच बाबासाहेबांनी म्हटले आहे- “ आपल्याला मूल होऊ द्यावे अथवा नाही हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असले पाहिजे आणि कोणत्याही कारणासाठी जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला ती गर्भधारणाच टाळता येण्याची सुविधा असली पाहिजे.”

प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे तपासून पाहणारा बाबासाहेबांमधला समाजशास्त्रज्ञ संततीनियमनावरील या चर्चेत आपल्याला ठळकपणे दिसतो. बालविवाह बंद होऊन मुलींच्या विवाहाचे वय वाढल्याने आपोआपच लोकसंख्या नियंत्रण होईल, त्यासाठी संततीनियमनाची गरज नाही,असे काहींना वाटत होते; पण १९३१च्या जनगणनेवरील श्री. पी. के. वत्तल यांचे जननदरासंबंधीचे अभ्यासपूर्ण संशोधनच बाबासाहेबांनी सभागृहासमोर ठेवले आहे, वीस वर्षांच्या नंतर लग्न झालेली मुलगी वीस वर्षांच्या आत लग्न झालेल्या मुलीपेक्षा कमी मुलांना जन्म देते आणि वीस वर्षांनंतर लग्न झालेल्या मुलीला मुलीला झालेली मुले वीस वर्षांच्या आत लग्न झालेल्या मुलीच्या अपत्यांपेक्षा जगण्याची शक्यता जास्त असते. ‘सर्व्हावयल रेट’ असा शब्दप्रयोग बाबासाहेबांनी वापरला आहे. म्हणजेच केवळ मुलीच्या लग्नाचे वय वाढून लोकसंख्या नियंत्रण होणार नाही, त्यासाठी संतती नियमनाच्या पध्दतीच वापराव्या लागतील, हे बाबासाहेब सप्रमाण सिध्द करतात. देशांतर-स्थलांतर, संपत्तीचे समान वाटप किंवा स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याने आपोआप लोकसंख्या नियंत्रण होणार नाही. त्यासाठी संततीनियमन साधनांचा आधार घ्यावाच लागेल, हे बाबासाहेब सोदाहरण स्पष्ट करतात.

चौथ्या बाळंतपणानंतर माता मृत्यू आणि बालमृत्यू देखील अत्यंत वेगाने वाढतात, हे डॉ.मुन्रो यांच्या Maternal Mortality and Morbidity या पुस्तकातील वैद्यकीय वास्तवही ते सभागृहापुढे ठेवतात.

संतती नियमनामुळे आपल्या वंशाची, धर्माची लोकसंख्या कमी होऊन आपले बळ घटेल असा भयगंडही अनेक मूलतत्ववाद्यांच्या मनात घर करुन बसला आहे. जननदर नव्हे तर सर्व्हावयल रेट महत्वाचा आहे, हे आंबेडकर स्पष्ट करतात. वाढत्या जन्मदरासोबत बालमृत्यूदर व मातामृत्यूदरही वाढतो. महायुध्दांमध्ये कमी जननदर असणा-या राष्ट्रांनी अधिक जननदर असलेल्या राष्ट्रांवर कुरघोडी केली या इतिहासापासून धडा घेण्यास बाबासाहेब सांगतात. आधुनिक युध्दांना माणसे लागत नाहीत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने युध्दे खेळली जातात आणि मुळात लोकसंख्या नियंत्रणामुळे दारिद्र्य कमी झाले की युध्दखोरी आपोआपच कमी होते. ऐश्वर्य, संपत्ती, प्रतिष्ठा, संस्कृती या गोष्टी लोकसंख्येवर नव्हे, तर गुणवत्तेवर अवलंबून असतात,हे सांगताना बाबासाहेब आपल्याकडील पारशी समाजाचे उदाहरण देतात.

लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व विशद करताना बाबासाहेबांनी अनेक देशांचे दाखले दिले आहेत. ‘एक तृतीयांश अमेरिकन नागरिकांना कमी प्रतीच्या अन्नावर गुजराण करावी लागते’ हे त्यावेळच्या अमेरिकन अध्यक्ष रुझवेल्ट याचे उद्गार आंबेडकरांनी उधृत केले आहेत. आपल्यापेक्षा कमी जननदर असलेल्या अमेरिकन जनतेला पुरेसे अन्न मिळत नाही,यापासून आपण बोध घ्यायला हवा. प्रत्येक विषयातील बाबासाहेबांचा सूक्ष्म अभ्यास ठायी ठायी दिसून येतो. मुंबईचे उदाहरण देत बाबासाहेब सांगतात, “ मुंबईला दर माणशी दररोज एक पिंट(सुमारे अर्धा लिटर) दूधाची गरज आहे पण प्रत्यक्षात अवघे सव्वा तोळा दूध मिळते”

संतती नियमनावरील हा बिनसरकारी ठराव विधिमंडळात मांडताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाचे मुंबई विधानसभेतील नेते होते. त्यांचे १४ सहकारीही विधानसभेवर होते. हा ठराव मतदानासाठी मांडताना बाबासाहेब म्हणाले होते, “ मुंबई हे भारताचे प्रवेशव्दार आहे. याच प्रवेशव्दारातून संतती नियमनाची ही चळवळ या प्रांतात प्रवेशली आहे. या प्रांतात ही चळवळ फोफावायला हवी. आपले नाव अमर होईल अशी कृती करण्याची संधी व्यक्तीला क्वचितच लाभते.आपल्या प्रांतिक सरकारला ही संधी संतती नियमनाच्या चळवळीने दिली आहे. आमचे प्रांतिक सरकार ही संधी हातातून दवडणार नाही.”

परंपरेचा पगडा असणा-या विधिमंडळाला बाबासाहेबांची ही कालदर्शी नजर उमजली नाही आणि संततीनियमनाचा हा ठराव ५२ विरुध्द १ एवढ्या प्रचंड फरकाने फेटाळला गेला पण त्यानंतर १३ वर्षांनी म्हणजे १९५१ साली भारत सरकारला बाबासाहेबांनी दाखवलेल्या वाटेनेच जावे लागले आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेत कुटुंबनियोजन धोरणाचा अवलंब करण्यात आला.

अर्थात बाबासाहेबांना आपल्या जनतेच्या शहाणपणाबद्द्ल पुरेपूर खात्री होती आणि म्हणून ते १९३८ सालीच म्हणाले होते, “ आपले हित कशात आहे हे आपल्या देशातील अडाणी माणसालाही चांगले कळते. संततीनियमनाच्या साधनांच्या शोधाबद्दल व त्यांच्या उपलब्धतेबद्दल माहिती मिळताच ते त्याचा पुरेपूर वापर करतील यात मुळीच शंका नाही.”

इतिहासतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विधिज्ञ, पुरातत्वशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून बाबासाहेबांना आपण सारेच ओळखतो पण सार्वजानिक आरोग्याच्या क्षेत्रातील त्यांचे महत्वपूर्ण योगदान लक्षात घ्यावयाची गरज आहे. फेब्रुवारी १९२७ मध्ये मुंबई विधिमंडळात दारु प्रश्नावर बोलताना भारतातील विविध प्रांतात दर डोई दारुवर होणा-या खर्चाचे आकडेच उधृत केले आहेत आणि इतर प्रांताच्या तुलनेत मुंबई प्रांतात दारुवरील दरडोई खर्च अडीचपट आहे, हे सांगितले आहे. प्रत्यक्ष खपापेक्षा जास्त दारुचे परवाने का दिले जात आहेत असा जाब त्यांनी सरकारला विचारला आहे.दारुचे व्यसन सर्वसामान्यांच्या बरबादीचे प्रमुख कारण आहे आणि म्हणूनच बाबासाहेब प्रांतिक सरकारला खडसावतात, “ जनतेची उन्नती हे सरकारचे उद्दिष्ट असले पाहिजे. तुम्ही त्यांना भिकारी बनवू नका.जनतेला भिकेस लावणारे सरकार अखेरीस स्वतःच भीक मागू लागते.” बाबासाहेबांचे हे जहाल शब्द सर्वसामान्यांविषयी असलेल्या कळवळ्यातून आले आहेत.

१९३६ साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना बाबासाहेबांनी केली. कामगारांच्या कामाचे तास व किमान वेतन ठरविण्यासोबतच आजारी रजा, वृध्दत्व पेन्शन, अपघात नुकसान भरपाई इतर आरोग्य सुविधा या सा-या गोष्टे पक्षाच्या ध्येयधोरणाच्या प्रमुख घटक होत्या.
स्त्री कामगारांना गरोदरपणात हक्काची पगारी सुट्टी मिळावी, प्रसूतिपूर्व आणि प्रसूतिपश्चातही विश्रांती मिळावी आणि सा-याची आर्थिक जबाबदारी सरकारने घ्यावी, ही बाबासाहेबांची इच्छा होती.मजूर मंत्री असताना “मॅटर्निटी बेनेफिट ऍक्ट” लागू होण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

सार्वजनिक आरोग्य हा खरे म्हणजे आंतरविद्याशाखीय समज असणा-या प्रज्ञावंतांचा विषय. आणि म्हणूनच इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कायदा, राज्यशास्त्र या सारख्या विषयात गती असणारे बाबासाहेब जेव्हा सार्वजनिक आरोग्यावर बोलू लागतात तेव्हा ते रुढ अर्थानेही समाजाचे खरेखुरे ‘डॉक्टर’ आहेत याची खात्री पटते. नाहीतरी एका माणसाच्या दुखण्याचा इलाज कोणा डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये होऊ शकत असेल पण समाजाच्या सामुहिक दुखण्यांसाठीची वाट सामाजिक,आर्थिक आणि राजकीय परिवर्तनातूनच गवसत असते.

बाबासाहेबांबद्दल लिहताना एका कवितेत मी म्हटले आहे-

“आवस माखल्या आभाळाची
लालतांबडी पहाट तू !
न आटणा-या आडाचा
गुणगुणणारा रहाट तू !

कोरड पडलेल्या ओठांसाठी
चवदार तळ्याचे पाणी तू !
माणूस हरविलेल्या दुनियेसाठी
कबिराची वाणी तू !”

सार्वजनिक आरोग्यातील गळाबंद कोटांना आणि एसी सेमिनार रुममधील चर्चांना ही कबीर वाणी सर्वसामान्यांवरील प्रेमाचे ‘ढाई अक्षर’ पाजून प्रत्येक झोपडीच्या दारापर्यंत घेऊन जाईल,यात काय शंका ?
या कबीराची गरज आज कधी नव्हे एवढी सार्वजानिक आरोग्य क्षेत्रात आहे.

© डॉ प्रदीप आवटे.

 

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *