मुंबई: विशेष प्रतिनिधी
२५ वर्षाच्या अभेद्य युतीला रामराम करत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात सरकार स्थापन केल्याने शिवसेना आमदार आणि मंत्र्यांना केंद्रिय यंत्रणांमार्फत त्रास देण्याचे काम सुरु असल्याने आपण पुन्हा एकदा भाजपासह जुळवून घ्यावे अशी विनंती करणारे पत्र व्हायरल झाल्यानंतरही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अजित पवारांना “सोबती”ने काम करण्याचा शब्द दिल्याची माहिती उघडकीस आली. त्यामुळे महाविकास आघाडीतून तुर्तास शिवसेना बाहेर पडणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना स्वबळाचा नारा हा नारा नसून आपला तो हक्क असल्याचे वक्तव्य करत स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला कानपिचक्या दिल्या. त्यास काही तासांचा अवधी उलटून जात नाही. तोच शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांचे एक पत्र व्हायरल होत मी प्रताप सरनाई, रविंद्र वायकर आणि मंत्री अनिल परब यांना केंद्रिय यंत्रणांकडून त्रास देण्यात येत असून त्याचा आघात कुटुंबियावरही होत असल्याची बाब अधोरेखित करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना फोडण्याचा आरोपही केला. त्यामुळे आपण पुन्हा एकदा भाजपाशी जुळवून घ्यावी अशी विनंती सरनाईक यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर होतेय की काय अशी अटकळ राजकिय वर्तुळात बांधली जावू लागली.
मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ट्विटरवरून शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्विकारत महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सोबत काम करू असा शब्द दिला. त्यामुळे राज्यातील अस्थिर झालेले वातावरण काही प्रमाणात निवळल्याचे स्पष्ट झाले असून त्या पत्राचा परिणाम महाविकास आघाडीवर काही होईल असे तरी सध्या तरी दिसत नसल्याचा अंदाज राजकिय तज्ञांकडून बांधण्यात येत आहे.
दरम्यान आज दिवसभर यासंदर्भातील चर्चा सुरु असताना शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनीही महाविकास आघाडी सरकार आपला ५ वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करेल असे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
आपल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद @AjitPawarSpeaks जी. महाराष्ट्राच्या विकासासाठी जोमाने काम करू!! https://t.co/9If7ESGbq3
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 20, 2021
प्रताप सरनाईक काय लिहीले त्या पत्रात वाचा खाली——