सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा हे आपल्या धीरगंभीर आणि विद्धवतापूर्ण न्यायालयाच्या निकालामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले जाते. मात्र त्यांनी आपलं जीवनात काय करायचे होते याची आठवण सांगत सक्रिय राजकारणाचे आकर्षण त्यांनाही तरूण पणात होते याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली. झारंखड उच्च न्यायालयाच्या आज झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा म्हणाले की, तरुण असताना सक्रीय राजकारणात जाण्यासाठी उत्सूक होतो. मात्र, नियतीला वेगळंच हवं होतं असेही यावेळी नमूद केले.
गावातील एका शेतकरी कुटुंबातील जन्म ते सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश या संपूर्ण प्रवासाची माहिती श्रोत्यांना दिली.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा म्हणाले, माझा जन्म एका गावात शेतकरी कुटुंबात झाला. मी सातवी / आठवीत असताना इंग्रजी विषयाशी ओळख झाली. तेव्हा दहावी उत्तीर्ण होणं हे मोठं यश होतं. बी. एससी पदवी घेतल्यानंतर माझ्या वडिलांच्या प्रोत्साहनामुळे मी कायद्याची पदवी घेतली. यानंतर मी विजयवाडा मॅजिस्ट्रेट कोर्टात वकिली करण्यास सुरुवात केली.
विजयवाडामध्ये काही महिने वकिली केल्यानंतर पुन्हा एकदा माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहन दिलं आणि मी हैदराबादला आलो. येथे मी आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात वकिली केली. तेव्हा मला न्यायाधीश होण्याची ऑफरही मिळाली. मी तालुका स्तरापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये काम केलं. माझी माझ्या राज्याचा अतिरिक्त महाधिवक्ता म्हणूनही नियुक्ती झाली होती असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मी सक्रीय राजकारणात जाण्यासाठी उत्सुक होतो, पण नियतीला वेगळंच मान्य होतं. ज्यासाठी खूप मेहनत घेतली ते सोडून देण्याचा निर्णय सोपा नव्हता. माझा वकिली ते न्यायाधीश बनण्यापर्यंतचा प्रवास सहज नव्हता. मागील अनेक वर्षे मी माझं करिअर लोकांच्या अवतीभोवती निर्माण केलं. मात्र, वकिली सोडून न्यायाधीश होण्याचा निर्णय घेतल्यास मला माझे सामाजिक आयुष्य सोडून द्यावे लागेल याची मला कल्पना होती. मी न्यायाधीश म्हणून मागील अनेक वर्षे माझं आयुष्य एकांतात घालवलं असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.