मराठी ई-बातम्या टीम
जवळपास दिड महिने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आजारापणामुळे सरकारच्या दैंनदिन कामकाजातून बाजूला झालेले आहेत. मात्र किमान हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तरी प्रथा आणि परंपरेनुसार मुख्यमंत्री हे आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला हजर राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली असतानाच राज्याचे आणि सरकारचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनीच सरकारी चहापानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सुरुवातीला मुख्यमंत्री हे ऑनलाईन पध्दतीने या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात येत होते. परंतु राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन हजेरी लावत आपली उपस्थिती दार्शविली.
मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हाही पावसाळी, हिवाळी आणि अर्थसंकल्पिय अधिवेशन पार पडले त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचा कार्यक्रमच रद्द केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चहापानाचा कार्यक्रम रद्द केल्याने त्याबाबतची चर्चाही फारशी कोणी केली नव्हती. परंतु आता मुख्यमंत्र्यांवर दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना पुरेसा आराम मिळाल्याचे गृहीत धरून किमान या अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री पुन्हा सक्रिय होतील अशी अटकळ सर्वच राजकिय पक्षांकडून व्यक्त करण्यात येत होती. परंतु मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी असतानाही सत्ताधाऱ्यांच्या चहापानासाठी हजर झाले नसल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, मुख्यमंत्र्यांची तब्यात बरी असून ते शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांनी मला स्वतः अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना बोलावून चर्चा केली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे चहापानाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित हजर राहीले. त्यामुळे चहापानाच्या कार्यक्रमासाठी उपस्थितीत असलेल्या सर्व मंत्री आणि आमदारांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याचबरोबर उद्या सकाळी महाविकास आघाडीच्या आणि समर्थक आमदारांची बैठक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्देशानुसार विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात बोलाविण्यात आली आहे. या बैठकीस मुख्यमंत्र्यांना कधीही वेळ मिळाला की ते हजर राहणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.