राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधीही जाहिर होऊ शकतात या अनुषंगाने जवळपास सर्वच राजकिय पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज शिंदे-फडणवीस सरकारचा आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. मात्र साधारणतः अर्थसंकल्प सादर होण्याआधी त्यातील एखादी घोषणा जर बाहेर आली तर अर्थसंकल्प आधीच फुटला म्हणून राज्य सरकारच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला जातो. मात्र अर्थसंकल्पातील आरोग्य विषयक तरतूदीची घोषणा आधीच आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केल्याने अर्थसंकल्प फुटला का याबाबत संशय निर्माण झाला असून त्याबाबत हक्कभंग प्रस्ताव मांडला जाणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
होळी आणि धुलिवंदन सणानिमित्त विधिमंडळ अधिवेशनाला चार दिवसांची सलग सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे प्रलंबित कामकाज उरकण्यासाठी विधानसभेचे कामकाज आज सकाळी ९.४५ वाजता विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.राहुल पाटील यांनी लक्षवेधीद्वारे महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करणार का असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी २०१२ सालापासून ते २०२३ पर्यंत महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत लाभ घेणाऱ्यांना १ लाख ५० हजार रूपयांची उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ही उत्पन्न मर्यादा दिड लाखावरून पाच लाख करण्यात येत असल्याची घोषणा केली. तसेच किडनी प्रत्यारोपनासाठीच्या रकमेतही वाढ करत ही रक्कम ४ लाख रूपये करण्यात येत असल्याची घोषणा केली.
त्यानंतर दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील उत्पन्न मर्यादा दिड लाख रूपयांवरून पाच लाख रूपये करण्यात आल्याची आणि किडनी प्रत्यारोपनसाठी २.५० लाखावरून ४ लाख इतकी रक्कम वाढविण्यात आल्याचे जाहिर केले.
त्यामुळे अर्थसंकल्पातून होणारी घोषणा आधीच आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आधीच जाहिर केली. त्यामुळे सदर योजनेची माहिती सभागृहातून जाहिर होऊन ती अर्ध्याहून अधिक जनतेपर्यंत प्रसारमाध्यमातून पोहचलीही. त्यानंतर तीच बाब पुन्हा अर्थसंकल्पातून जाहिर करण्यात आली. त्यामुळे अर्थसंकल्प आधीच फुटल्याची घटना होत असल्याचे होत असल्याची मत विधिमंडळातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तसेच त्याबाबत राज्य सरकारच्या विरोधात विरोधकांकडूनही हक्कभंगही दाखल होऊ शकतो असे मत व्यक्त केले.
दरम्यान, विद्यमान मंत्री आणि तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना अर्थसंकल्पातील माहिती त्यांच्या ट्विटरवरून आणि फेसबुक प्रोफाईलवरून जनतेसाठी दिली जात होती. त्यावेळी विरोधकांनी मुनगंटीवार यांच्या विरोधात हक्कभक्कांचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. त्यामुळे मुनगंटीवार यांनी अर्धाधिक अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यांच्या सोशल मिडियातील अकाऊंटवरून माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र आज अर्थसंकल्प सादर होण्याआधीच चार तास अगोदर आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी जनआरोग्य योजनेत उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आल्याची घोषणा करणे आणि तीच माहिती पुन्हा अर्थसंकल्पातून जाहिर होणे यामुळे अर्धसंकल्प फुटला अशी चर्चा विधिमंडळात सुरू झाली.