महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. मात्र दुसरीकडे याच गावातील नागरिकांनी आमच्या पाण्याचा प्रश्न जो सोडविल त्या राज्यात जाण्याची तयारी तिकोंडीतील गावकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या गावकऱ्यांनी गावाच्या प्रवेशद्वारावरच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा मोठा फोटोही लावला असल्याचे धक्कादायक वृत पुढे आले. इतके होऊनही या गावच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून कोणतीच पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे.
तिकोंडी येथे शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे अभिनंदन करणारा फलक वेशीवर लावण्यात आला. रविवारी सकाळी उमराणी येथे सर्वपक्षीय बैठकीत सहा महिन्यात पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
तिकोंडी येथे काही ग्रामस्थ कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक आहे, असे सांगत फलक घेऊन फेरी काढण्यात आली. आम्ही कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक आहेत असेही ग्रामस्थ म्हणत आहे. गावातील वेशीवरच्या स्वागत कमानीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मईं यांचा फोटो असलेला फलक लावण्यात आला होता. काही काळानंतर हा फलक काढून टाकण्यात आला.
महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत कर्नाटक सरकार वेगवेगळ्या सोई – सुविधा व अनुदान देत आहे. तर महाराष्ट्र सरकार म्हैसाळ योजनेचे पाणी देणार, असे गेल्या ४ दशकापासून वारंवार आश्वासन देत आहेत. याच मुद्द्यावर निवडणूक लढवल्या आहेत. तसेच पाणी देण्याचे गाजर दाखवत आहे. आम्हाला महाराष्ट्र कोणतीही सुविधा देत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
गावातील कमानीवर बोम्मईंचे छायाचित्र असलेला व कन्नड भाषेत आभार मानण्यात आल्याचा फलक लावण्यात आल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप करून फलक ताब्यात घेतला. दरम्यान उमराणी येथेही रविवारी सकाळी सर्वपक्षिय बैठक झाली. या बैठकीत राज्य शासनाला निर्वाणीचा इषारा देण्यात आला.