मुंबईः प्रतिनिधी
रस्त्यांने चालताना कचरा टाकणार असाल किंवा थुंकणार असाल किंवा लघवी लागली असेल तर योग्य ठिकाणीच या सर्व गोष्टी करा. नाहीतर या गोष्टी करून बसाल आणि त्याची भरपाई तुम्हाला १०० ते ५०० रूपये भरून करावी लागेल. राज्यात स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने रस्त्यांवर थुंकणे, कचरा आदी टाकूण घाण करणे, उघड्यावर लघवी, शौच करणाऱ्या व्यक्तीस दंड आकारण्यात येणार असून दंड वसूलीचे अधिकार महापालिका, नगर परिषदांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील प्रत्येक ठिकाण स्वच्छ रहावे यासाठी राज्य सरकारकडून नुकताच एक अध्यादेश काढला आहे. यानुसार अ, ब वर्गातील महापालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीतील रस्ते मार्गावर घाण केल्यास १८० रूपयांचा दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १५० रूपये, उघड्यावर लवघी केल्यास २०० रूपयांचा दंड तर शौच केल्यास ५०० रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच हे दंड आकारून त्याची वसूली करण्याचे अधिकार महानगर पालिका आणि नगर परिषदांच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने ३० डिसेंबर २०१७ रोजी अध्यादेश काढत त्याचे अधिकार राज्यातील सर्व महापालिका आणि नगर परिषदांना दिले आहेत.
याचधर्तीवर क, ड वर्गातील महापालिका आणि नगर परिषदांच्या हद्दीत कचरा केल्यास १५० रूपयांचा दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १०० रूपयांचा दंड, उघड्यावर लघवी केल्यास १०० रूपयांचा दंड आणि उघड्यावर शौच केल्यास ५०० रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना, थुंकताना आणि लघवी किंवा शौच करताना नागरीकांना आता काळजी घ्यावी लागणार आहे.