नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांकडून महापुरूषांचा सातत्याने करण्यात येत असलेल्या अवमानाच्या विरोधात महामोर्चाही काढला. मात्र त्यावर अद्याप शिंदे-फडणवीस सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. त्याच्या निषेधार्थ विधिमंडळाच्या गेटवर सोलापूरच्या एका महिलेने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना संध्याकाळी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर घडली.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी थेट शिवाजी महाराजांची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केली. त्यापाठोपाठ शिंदे-फडणवीस सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर थेट महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु करण्यासाठी लोकांकडे भीक मागितली असे वादग्रस्त विधान केले. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या आणि राज्यपालांच्या विरोधात महाविकास आघाडीने मोर्चाही काढला. मात्र अद्याप भाजपाच्या मंत्री आणि राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात कोणतीच कारवाई झाली नसल्याने सदर महिलेने हा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
महिलेने केलेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे विधिमंडळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आत्मदहनाचा प्रयत्न: महापुरूषांचा अपमान करून देखील अशा व्यक्तींवर यावर सरकार काहीही करत नाही. या रागातून महिलेने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतले. कविता चव्हाण असे या महिलेचे नाव असून त्या सोलापूर येथील रहिवासी आहेत.