Breaking News

साहित्यिक आणि समिक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक- समिक्षक तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

साठोत्तरीच्या कालखंडात कविता, कथा, दिर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समिक्षा अशा विविध वाड्:मय प्रकारात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी दर्जेदार साहित्य निर्मिती केली. कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ साली नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. बी.ए. आणि एम.ए या दोन्ही परिक्षात ते मराठवाडा विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना कुलपती पदक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकिस्तक अभ्यास या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी १९८० साली पीएचडी पदवी संपादन केली. बीड येथील महाविद्यालयात १९७१ ते १९७७ या काळात मराठीचे अधिव्याख्याते म्हणून काम केल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी अधिव्याख्याता आणि प्रपाठक या पदावर १९७७ ते १९९६ या काळात काम केले.

त्यानंतर १९९६ ते २००५ या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून डॉ.कोत्तापल्ले यांनी काम केले. त्यानंतर २००५ सालापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू म्हणून काम केले.  महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य अकादमी या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष (१९८८-१९८९), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते.

मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. श्रीगोंदा येथे १९९९ साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि २००५ साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चिपळूण येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे साहित्य
‘मूड्स’ (कवितासंग्रह)
‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘संदर्भ’, ‘कवीची गोष्ट’, ‘सावित्रीचा निर्णय’, ‘देवाचे डोळे’ (कथासंग्रह)
‘राजधानी’ (दीर्घकथा संग्रह)
‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘प्रभाव’ (कादंबरी)
‘पापुद्रे’, ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि बोध’, ‘नवकथाकार शंकर पाटील’, साहित्याचा अन्वयार्थ’, ‘मराठी कविता : एक दृष्टिक्षेप’, ‘साहित्याचा अवकाश’ (समीक्षात्मक)
‘गावात फुले चांदणे’ (प्रौढ नवसाक्षरांसाठी लघुकादंबरी)
‘मराठी साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक संघर्ष’, ‘उद्याच्या सुंदर दिवसासाठी’ (ललित गद्य),
‘जोतीपर्व’ (अनुवादित पुस्तक)
‘स्त्री-पुरुष तुलना’, ‘शेतकऱ्यांचा असूड’, ‘पाचोळा आणि दहा समीक्षक’, ‘निवडक बी रघुनाथ’ (संपादन) पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *