केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून मागील ८ वर्षात लोकशाही व राज्यघटना धोक्यात आली आहे. लोकशाही व राज्यघटनेचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पुढाकाराने राज्यघटनेच्या एक लाख प्रती वाटण्याचा संकल्प केला असून या अभियानाची सुरूवात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या हस्ते आज करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोटीया, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश, प्रभारी. एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षनेते तथा भारत जोडो यात्रेचे राज्य समन्वयक बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबारे, जेष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना भारताला दिली. या राज्यघटनेच्या अधिन राहून लोकशाही व्यवस्थेचा कारभार देश स्वतंत्र झाल्यापासून सूरु आहे. राज्यघटनेने सर्व जाती धर्मांच्या लोकांचे हक्क अबाधित ठेवले आहेत. विविधतेत एकता ही आपल्या देशाची ओळख कालपर्यंत अबाधित होती, पण मागील ८ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे सरकार केंद्रात आल्यापासून राज्यघटना व लोकशाही मोडीत काढण्याचे काम सुरू आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली ही राज्यघटना अबाधित रहावे व लोकशाहीचे रक्षण व्हावे यासाठी जनजागृती करण्यासठी संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याचे अभियान काँग्रेसच्या एस. सी. विभागाने हाती घेतले आहे.