फक्त वसाहतवादापासून मुक्ततेसाठी स्वातंत्र्यलढा लढला गेला नव्हता. तर हा लढा सर्वांच्या सन्मानासाठी तसेच लोकशाहीची स्थापना करण्यासाठी लढण्यात आला होता. लोकाशाहीचा पाया रचण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून झाले. संविधान सभेमध्ये सखोल विचारविनिमय करून आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेल्या भारतीय संविधान संविधानाची निर्मिती झाली. मात्र आपण जेव्हा एकमेकांचा तसेच देशातील विविधतेचा सन्मान करू तेव्हाच ही व्यवस्था खऱ्या अर्थाने लोकांची होईल, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशन (SCBA) ने सुप्रीम कोर्ट लॉन्स येथे देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला एन. व्ही. रमणा यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील मत वक्तव्य केले.
यावेळी बोलताना सरन्यायाधीश रमणा यांनी स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, फक्त वसाहतवादापासून मुक्ततेसाठी स्वातंत्र्यलढा लढला गेला नव्हता. तर हा लढा सर्वांच्या सन्मानासाठी तसेच लोकशाहीची स्थापना करण्यासाठी लढण्यात आला होता. लोकाशाहीचा पाया रचण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून झाले. संविधान सभेमध्ये सखोल विचारविनिमय करून आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेल्या भारतीय संविधान संविधानाची निर्मिती झाली.
रमणा यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, सदर पटेल, सीआर दास, लाला लजपत राय, आंध्र केसरी टंगुतुरी प्रकाशम पंतुलू या स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख केला. तसेच सैफुद्दीन किचलू आणि पीव्ही राजमन्नर यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्याचा लढा रस्त्यापासून न्यायालयातपर्यंत लढला. या सर्वांच्या योगदानामुळेच स्वातंत्र्य मिळणे शक्य झाल्याचेही ते म्हणाले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात वकिलांनी दिलेल्या योगदानाचाही उल्लेख यावेळी रमणा यांनी केला. किफायतशीर आणि लाभदायक असलेला वकिली व्यवसाय सोडून अनेकांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी आपले योगदान दिले. आपले प्रत्येक काम हे संविधानच्या कक्षेतच असावे. आपली न्यायव्यवस्था ही संविधानाप्रती बांधिकली जपते, तसेच आपल्या न्यायव्यवस्थेप्रती लोकांचा विश्वास आहे. याच कारणामुळे आपली न्यायव्यवस्था ही अद्वितीय असल्याचे त्यांनी सांगितले.