काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आवाज असलेला सरसेनापती प्रताप गुर्जर यांच्यावर आधारीत हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी स्वत: राज ठाकरे यांनी प्रयत्न केले. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटावर सर्वचस्तरातून टीकेचा मारा सुरु झाला. त्यामुळे या चित्रपटाच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी कोल्हापूर दौऱ्यात ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांची भेट घेवून चर्चा केली. त्यानंतर जयसिंगराव पवार यांनी आज प्रसिध्दी पत्रक काढत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे इतिहासाचे लेखन म्हणजे अनऐतिहासिक आणि विकृत असल्याचे जाहीर केले.
जयसिंगराव पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये माझी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते माझ्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांच्याबरोबर इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटांतून होणारा विपर्यास यावर चर्चा झाली.
मी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देऊन आजच्या काळाच्या संदर्भात त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. प्रबोधनकारांचा विचार घेऊन मुख्यमंत्री म्हणून आल्यावर आपण महाराष्ट्रात धडाकेबाज काम कराल आणि त्याचे मी स्वागत करेन, असे मी म्हणालो. माध्यमांमध्ये या विधानाची अतिशयोक्ती झाली. यावेळी त्यांच्याशी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर काहीही चर्चा झाली नाही, अशी माहिती जयसिंगराव पवार यांनी दिली.
जयसिंगराव पवार पुढे म्हणाले, राज ठाकरे निघून गेल्यावर पत्रकारांनी मला बाबासाहेब पुरंदरेंबद्दल प्रश्न विचारला. त्यावर मी इतिहासकार म्हणून पुरंदरेंचे गौरवीकरण करणारे वक्तव्य केलेले नाही. कारण मी आतापर्यंत लिखाणातून व संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली आहे आणि त्यावर आजही ठाम असल्याचे त्यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकातून जाहीर केले.
या संदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे माझ्या वैचारिक भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. म्हणून मी हा खुलासा देत आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी या पत्रकान्वये दिले.
जयसिंगराव पवार यांनी जारी केलेले हेच ते प्रसिध्दी पत्रक