मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकांसाठी प्लास्टिक उत्पादक व्यापाऱ्यांकडून निवडणूक फंड गोळा करण्यासाठी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याचे अशी बोचरी टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर केली.
प्लॅस्टिकबंदीचा निर्णय हा सरकारचा आहे की एका खात्याचा आहे हे स्पष्ट होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही, असे सांगतानाच राज ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेने प्लॅस्टिकबंदीचा दंड भरू नये असे आवाहन केले.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गेल्या शनिवारपासून राज्यात प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडत त्यांच्यावर सडकून टिका केली. कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
प्लॅस्टिकबंदीचा निर्णय हा नोटाबंदीच्या निर्णयासारखाच आहे. कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात राज्य सरकार, महापालिका या स्वतःच्या जबाबदा-या पार पाडत नाहीत. सरकार आणि महापालिका आपले अपयश जनतेच्या माथी मारत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. एखाद्याला आलेला झटका हे काही राज्याचे धोरण असू शकत नाही. मुळात प्लॅस्टिक आदी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही महापालिकांची असते. आज महापालिकांनी किती ठिकाणी कचराकुंड्या लावल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी असणाऱ्या डंपिंग ग्राउंडच्या जागा आज बिल्डरांच्या घशात जात आहेत. महाराष्ट्रातील नद्यांमध्ये खुलेआम प्रदूषित पाणी सोडण्यात येत आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम त्याबाबत काहीच का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.जोपर्यंत त्याला योग्य पर्याय देत नाहीत तोपर्यंत ही कारवाई कशाला? म्हणून जोपर्यंत सरकार योग्य पर्याय देत नाही तोपर्यंत जनतेने दंडाचा एक रूपयाही भरू नये असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. मनसेचे कार्यकर्ते जनतेला योग्य ती साथ देतील असेही ते म्हणाले. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय हा दोन महिनेच टिकेल. त्यानंतर सगळे सुरळित होईल. म्हणूनच निवडणूक फंडासाठीच हा निर्णय घेतला असल्याच्या शंकेला वाव असल्याचेही ते म्हणाले.