शिवसेना प्रवक्ते अँड. अनिल परब यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी
बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप ताणला गेला तो केवळ शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच. त्यासाठी शशांक राव यांना हा संप ताणण्यासाठी नारायण राणे, आशिष शेलार आणि कपिल पाटील यांनी मदत केल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते अँड. अनिल परब यांनी करत हा संप लांबविण्यासाठी अदृश्य हात असल्याचे उघडकीस आल्याचे आरोपही त्यांनी केला. ही सर्व नावे शशांक राव यांनीच उघड केल्याने केवळ शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच हा संप ताणला गेल्याचे उघड झाल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बेस्टच्या कामगारांच्या मागण्यांबाबत शिवसेनेने जी भूमिका घेतली होती. तीच भूमिका न्यायालयानेही घेतली. शिवसेनेने संपूर्ण कामगारांचा विचार करून संप मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा संप मागे घेतला तेव्हा न्यायालयाच्या आदेशाची प्रत आमच्या हाती नव्हती. मात्र न्यायालयाने दिलेले आदेश आणि शशांक राव यांनी कामगारांना दिलेली माहिती यात प्रचंड तफावत असल्याचे सांगत राव यांनी ज्युनिअर कामगारांचा प्रश्न ताणून धरल्याने संप ताणला गेला. केवळ याच गोष्टीसाठी शिवसेनेने संपाचा पाठिंबा काढून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
राव यांनी कामगारांच्या पगारात ७ हजारांची वाढ होईल असे सांगितले. त्यानुसार बेस्टमधल्या कामगारांनी पुढील महिन्याची पगाराची स्लीप दाखवावी मी माझे शब्द मागे घेईन असे आव्हान देत या संपा दरम्यान केवळ कामगारांना फसविण्याचे काम केले आहे. बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण करण्यासाठी यापूर्वीच महापालिकेत ठराव आधीच मंजूर झालेला आहे. त्यांच्या संपाची स्क्रिप्ट दुसऱ्यांनी लिहील्याने शशांक राव यांची कीव वाटत असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, याबाबत शशांक राव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कामगारांना मिळणारी पगरवाढ त्यांना ढाचत असल्यानेच शिवसेनेकडून असे आरोप केले जात आहेत.