मुंबई: प्रतिनिधी
काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मग आताच त्यांचं मतपरिवर्तन का झालं, असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला.
नाणारमध्ये २२१ गुजराती भूमाफियांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्या फायद्यासाठी राज ठाकरे ही मागणी करत आहेत का खरंच कोकणाच्या हितासाठी त्यांनी ही मागणी केली आहे, याची मला कल्पना नसल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
शनिवारी कोकणातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोकणवासियांना विकासाचे वचन देवून २४ तासाचा अवधी उलटून जात नाहीत, तोच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणातील नाणार प्रकल्पाच्या अनुषंगाने पत्र लिहीले. त्यामुळे नाणार प्रकल्पासाठी शिवसेनेच्या प्रयत्नाला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी अप्रत्यक्ष मनसेच्या माध्यमातून तर चर्चेला सुरुवात करून दिली नाही ना अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.
दरम्यान रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नाणार प्रकल्पांसाठी शिवसेनेचा असलेला विरोध कायम असून त्यात कोणताही बदल झालेला नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे आगामी काळात नाणार प्रकल्पावरून पुन्हा एकदा राजकारण रंगणार असल्याची चर्चा सुरु झाली असून कोकणात शिवसेना विरूध्द इतर असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.