Breaking News

मावळची परिस्थिती काय आहे हे समजून घेतले तर फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल माझ्या लक्षात राहत नाही ही माझी कमतरता शरद पवारांचा खोचक टोला

मुंबई: प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे घडलेल्या घटनेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मावळच्या घटनेचा उल्लेख केला. बरं झालं त्यांनी उल्लेख केला. तेथील घटनेला त्यावेळचे सत्ताधारी नाहीतर पोलिस जबाबदार होते. पोलिसांनी त्यांच्या कारवाईचा भाग म्हणून त्यांनी पोलिसांनी तशी कृती केली. त्यामुळे या घटनेबाबतचे आरोप पोलिसांवर होते. तसेच शेतकऱ्यांना दिलेल्या चिथावणी मागे तेथील भाजपा होती. स्थानिकांचा रोष असता तर राष्ट्रवादीचा उमेदवार सुनिल शेळके हे ९० हजाराच्या मताधिक्याने निवडूण आले नसते असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत फडणवीस यांनी तेथील माहिती घेतली असती तर त्यांच्या ज्ञानात भर पडली असती असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

बॅलार्ड पिअर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.

मावळ तालुक्यात जनसंघ आणि नंतर भाजपचे वर्चस्व होते. रामभाऊ म्हाळगी हे मावळचे लोकप्रतिनिधी होते. आज मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके हे ९० हजार मताधिक्याने निवडून आलेले आहेत. फडणवीस यांनी मावळचा उल्लेख केला ते बरं केले, कारण त्यांना आजची मावळची परिस्थिती काय आहे हे समजून घेतले तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल असा टोलाही त्यांनी लगावला.

लखीमपुर येथील शेतकऱ्यांसोबत घडलेल्या घटनेची दखल महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने घेतली ही काही क्षुल्लक गोष्ट नाही. त्यामुळे येथील जनतेबरोबरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार त्यांनी मानले.

लखीमपूर येथील घटनेत केंद्रीय गृह राज्यमंत्री मिश्रा यांचे सुपुत्र असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यावर तेथील उत्तर प्रदेश सरकार किंवा केंद्र सरकारकडून काही कारवाई होईल असे काही वाटत नाही. केंद्रातील मंत्र्याचा मुलगा अशा घटनांमध्ये सहभागी असताना सदर मंत्र्याचा राजीनामा द्यायला हवा होता अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आम्हाला एनसीबीचा अभिमान आहे. यंत्रणेचा अभिमान असणे ठिक आहे. पण कालच्या भाषणात त्यांनी सांगितले की, मी अजूनही मुख्यमंत्री असल्याचे वाटते. चांगली गोष्ट आहे त्यांना अजूनही सत्तेत असल्यासारखे वाटते. माझा अनुभव वेगळा आहे. मुख्यमंत्री पदावर काम केल्यानंतर पुढच्यावेळी मी विरोधी पक्षात काम केले. त्यावेळी प्रशासनाने सत्तेवर असताना आपल्याला दिलेले अहवाल आणि जमिनीवरची वास्तवता वेगळी असते. विरोधात असताना लोकांमध्ये फिरल्यानंतर त्याचा अभ्यास होतो असा टोलाही लगावत ते पुढे म्हणाले की, सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदी राहूनही फडणवीस हे अद्याप विसरू शकले नाहीत असा चिमटा काढत आजही ते मी पुन्हा येईन… येईन असे म्हणतात. मी ही चार वेळा राज्याच्या मुख्यमंत्री पदी राहीलो आहे. मात्र त्याची आठवण काही मला होत नाही. ही माझ्यातील कमतरता आहे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *