मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांकडून या सरकारला वेगवेगळ्या नावांनी पुकारले जात होते. मात्र हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ असून त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत सरकारला पहिल्यांदाच धार्मिक अधिष्ठाण देण्याचा प्रयत्न केला.
वर्षभरात संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम या शासनाने केले आहे. त्यामुळे संकटकाळात बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही. नविन उमेद आणि प्रदीर्घ अनुभव या समन्वयातून या शासनाची वाटचाल सुरू असल्याचे सांगतानाच लोकांचा सहभाग यात दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
या सरकारने एक वर्ष पूर्ण केले असून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतरही हेच सरकार राज्यात सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांचा परिणाम देशात नेहमीच घडत आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र प्रगती रस्त्याने निश्चित पुढे जाईल. विरोधकांनी कितीही टीका केली तर कोरोना काळातील त्यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे असल्याचे कौतुकही मुख्यमंत्री ठाकरे यांचे त्यांनी केले.