मुंबई: प्रतिनिधी
अनलॉक-५ अंतर्गत देशभरातील सर्व शाळा १५ ऑक्टोंबरपासून सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. मात्र त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारवर सोपविले. मात्र राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत महाविकास आघाडी सरकार अद्यापही उत्सुक नसून साधारणत: दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा विचार करत असून याअनुषंगाने ऑनलाईन शिक्षणाचा आढावा घेवून त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्देश दिले.
राज्यातील शाळा वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली. गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. या ऑनलाईन शिक्षण पध्दतीत साधारणत: किती अभ्यासक्रम शिकविण्यात आला, किती विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला. या सर्वबाबीं संदर्भात आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
शाळा सुरु करण्यासंदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांनी दिवाळीनंतर सुरु करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ९ ते १२ वी पर्यतचे वर्ग सुरु करण्याचा तर त्यानंतरच्या टप्प्यात बालवाडी ते ८ पर्यंतचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या माहितीनंतर सर्वच ठिकाणी शाळा सुरु होणार असल्याच्या वृत्ताने तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच याबाबतचे निर्देश दिल्याने शाळांबाबतची संभ्रवस्था संपुष्टात आली.