मुंबई: प्रतिनिधी
सध्या जे काही सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बदनामीलाच हातभार लागत असून यात आता मोठ्याने हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे. तसेच या दोन्ही पैकी एका नेत्याने आता हे थाबविण्याची गरज आहे. मला माहित आहे की, नवाब मलिक यांच्या जावायावर झालेल्या कारवाईमुळे ते चिडीने हे सगळं करत आहेत. काल मी राज्यपालांना भेटलो. त्यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली असून आता हे थांबविण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी व्यक्त केले.
केवळ निवडणूका जिंकण्यासाठी सध्या दोन चिखलफेख आपण पाहतोय त्यातून महाराष्ट्राला बदनामीचा डाग लागतोय. याचा कंटाळा कसा येत नाही यांना. हे आता थांबविण्याची गरज आहे. या चिखलफेकीची सुरुवात ज्यांनी केली त्यांना पळता भुई थोडी होतेय असा उपरोधिक टोला किरीट सोमय्या यांचे नाव न घेता लगावत राज्यात सध्या प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे असून त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी केली.
कुणी कोणाचे फोटो दाखवले तर तो संबध असल्याचा पुरावा होवू शकत नाही. रियाज भाटीचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही आहेत. मात्र भाजपाकडे जी वॉशिंग मशिन आहे त्या मशिनमध्ये घातले की सगळे कसे स्वच्छ होतात. ती मशीन भाजपानेच तयार केली आहे. गुंड, दाऊद, शकिलचे लोक आमच्याकडे असले तरी तो याचा माणूस त्याचा माणूस म्हणून भाजपामध्ये गेला की तो चकचकीत पांढरा होवून येतो. सध्याच्या राजकारणात कोणी कोणाकडे बोट दाखवू नये. त्यामुळे राज्यात सध्या सुरु असलेल्या चिखलफेकीमुळे कंटाळा कसा येत नाही. हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि इतर प्रश्नांकडे पाह्यलं हवं असेही ते म्हणाले.
शिवसेना ही कष्टकरी आणि कामगार वर्गातून जन्माला आली आहे. त्यामुळे भाजपाने आम्हाला शिकवू नये असे सांगत आमची भूमिका चुकीची आहे हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. तुमच्या काळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एसटी कामगार गेले होते. त्यावेळी मुनगंटीवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना विलनीकरण होवू शकत नाही असे सांगितल्याचे मी एका व्हिडिओत ऐकले असल्याचे स्पष्ट करत कामगारांना फुस लावणे, आंदोलन करणे ही नौटंकी भाजपाने बंद असा इशारा देत एसटी कामगारांनी त्यास बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.