मुंबई : प्रतिनिधी
जगातील सर्वात मोठ्या २० कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होण्याची क्षमता रिलायन्स इंडस्ट्रिजकडे असल्याचा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रिजच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, कंपनीच्या प्रगतीचे सारे श्रेय संस्थापक धीरूभाई अंबानी यांना जाते. आज आमच्याकडे २ लाख ५० हजार कर्मचारी आहेत. कंपनीची उलाढाल १००० रुपयांवरून ६ लाख कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. एका शहरापासून सुरू झालेला हा व्यवसाय आता २८ हजार शहरे आणि ४ लाख गावांमध्ये पोचला आहे.
यावेळी जगातील टॉप २० कंपन्यांमध्ये रिलायन्सचा समावेश होऊ शकतो का असे विचारले असता मुकेश अंबानी यांनी हे आम्ही करून दाखवणारच असा विश्वास व्यक्त केला. रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमात ५० हजाराहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. अन्य २ लाख कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून यात सहभाग घेतला. त्यासाठी देशभर १००० ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपले वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेने आपल्या भाषणाची सुरुवात केली. तर, शाहरुख खान वेगवेगळ्या शहरांतून भाग घेतलेल्या स्पर्धकांसोबत अंताक्षरी खेळली.