मुंबई: प्रतिनिधी
फेसबुक, व्हॉट्सअप तसंच ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाने आज सर्वानाच झपाटलं आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीजपर्यंत सर्वजण आज या मोहजालात अडकले आहेत, पण काही कलाकारांनी मात्र अद्याप या विश्वात डोकावण्याचं धाडस केलेलं नाही. बाळंतपणासाठी ब्रेक घेतलेल्या राणी मुखर्जीनेही आजवर या विश्वापासून दूरच राहणं पसंत केलं होतं.
आदिराच्या जन्मानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येताना मात्र राणी स्वत:ला सोशल मीडियापासून दूर ठेवू शकली नाही. रुपेरी पडद्यावर पुनरागमन करताना प्रेक्षक आणि आपल्या चाहत्यांशी पुन्हा कनेक्ट होण्यासाठी तिला या जगाचं दार ठोठवावच लागलं. ‘हिचकी’ या आगामी चित्रपटाद्वारे पुनगरामन करणाऱ्या राणीनेही सोशल मीडियाची जादू मान्य केली आहे. या द्वारे आपल्या चाहत्यांशी सहज टचमध्ये राहता येतं आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठीही याचा खूप फायदा होतो असं राणीचं मत आहे. इतर कलाकारांप्रमाणे मी देखील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहावं असं चाहत्यांना वाटत होतं. ‘हिचकी’च्या निमित्ताने हा योग जुळून आल्याने खूप आनंद होत असल्याचं राणी म्हणते. ‘हिचकी’च्या प्रमोशनच्या निमित्ताने राणीने आपल्या चाहत्यांशी सुरू केलेला संवाद पुढे कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची राणीची इच्छा असल्याचं यशराज फिल्म्सशी निगडीत असलेल्या सूत्रांकडून समजतं. त्यामुळे भविष्यातही राणी सोशल मीडियाशी कनेक्ट राहील असं मानायला हरकत नाही. २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘हिचकी’चं दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रांनी केलं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा राणीचा दमदार परफॉर्मंस पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.