Breaking News

राज ठाकरेंचा पंतप्रधानांना सवाल, रेमडेसिविरचे वितरण केंद्राकडे घेण्याचे प्रयोजन काय? अविश्वास दाखविण्याऐवजी राज्यांकडे जबाबदारी सोपविण्याची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना साथ रोगाशी लढण्याचे प्रमुख काम राज्यातील स्थानिक रूग्णालये, तेथील वैद्यकिय व्यवस्था राखणारे डॉक्टर, नर्सेस यांच्याकडून होत आहे. त्याचे नियोजन करण्याचा अनुभव त्यांचा जास्त आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बाधित रूग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर औषधाचे वितरण व्यवस्था स्वत:कडे अर्थात केंद्राने घेण्याचे काय प्रयोजन काय? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना करत रेमडेसिविरसह सर्व वैद्यकिय गोष्टींचे खरेदी-विक्रीचे अधिकार राज्यांना द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.

केंद्राने रेमडेसिविर वितरण व्यवस्था स्वत:च्या हाती घेतल्याने स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आरोग्य व्यवस्थेवर अविश्वास निर्माण कऱण्यासारखे आहे. तसेच त्यांच्या अनुभवाला कमी लेखणे आहे. गुजरात राज्यासह इतर राज्यांमध्ये सध्या असलेली परिस्थिती फारच भीषण आहे. त्यासंदर्भातील व्हिडिओ आणि माहिती ज्या प्रकारे बाहेर येत आहे. तेही काळजी करायला लावणारे आहे. या पार्श्वभूमीवर साथरोगाबाबतची यंत्रणा सक्षम करण्याची गरज असताना केंद्राने स्वत:कडे अधिकार घेण्याचे प्रयोजन काय? असा सवालही त्यांनी केला.

वाचा, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं सविस्तर पत्र

प्रति,

मा.श्री.नरेंद्र मोदी

पंतप्रधान, भारत सरकार

नवी दिल्ली.

सस्नेह जय महाराष्ट्र !

विषय : रेमडेसिविर आणि इतर औषधं, तसेच कोरोनासाठी अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावं

महोदय,

संपूर्ण देशात कोरोनानं हाहा:कार माजवला आहे. दिवसेंदिवस रूग्णांचे आकडे वाढत आहेत. काल तर देशात रूग्णसंख्येनं ३ लाखाचा आकडा मागे टाकला. मृत्यूचे आकडेही चिंताजनक आहेत. प्रेतांच्या रांगाच्या रांगा असलेली गुजरातमधली आणि बाकी राज्यातलीही दृश्यं पाहिली. ती मनातून जात नाहीत. ही वेळ खरंच भीषण आहे. राजकारणाची मुळीच नाही. आत्ता देशातल्या सर्वांनी एकत्र येऊन ह्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची आवश्यकता आहे.

आरोग्यसेवेची यंत्रणा संपूर्णपणे कोसळली आहे. कोरोनाबाबतच्या चाचण्या पुरेशा गतीनं होत नाहीत, रूग्णालयात पुरेशा खाटा नाहीत, उपचारासाठी आवश्यक रेमडेसिविर आणि इतर साधनं उपलब्ध नाहीत, अत्यंत गरजेचा असा ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत नाही. लसीकरण आपण खुलं केलं तर आहे, परंतु त्यासाठी योग्य संख्येनं पुरवठा होईल की नाही ह्याची खात्री नाही. आपण ह्या साथरोगाबाबतीतलं व्यवस्थापन फार काळजीपूर्वक उभं करण्याची गरज आहे.

भारताच्या इतिहासात इतकं मोठं आरोग्य संकट गेल्या १०० वर्षात आलं नसावं. हे आव्हान म्हणूनच फार मोठं आहे.

अशातच बातमी वाचली की रेमडेसिविर सारख्या कोरोनावरील उपचारासाठी अत्यंत आवश्यक अशा इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वत: करणार आहे. मला हे वाचून धक्काच बसला. आपण नुकतंच देशाला उद्देशून केलेलं भाषण मी काळजीपूर्वक ऐकलं. त्यात आपण राज्य सरकारांना काही सूचना केल्या आहेत आणि ह्या भयानक संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी काय काय पावलं उचलली पाहिजेत ह्याचं मार्गदर्शनही केलं आहे.

त्यानंतर मग रेमडेसिविर सारख्या औषधांची खरेदी आणि वितरण केंद्रानं स्वत:कडे ठेवण्याचं प्रयोजन काय? वास्तविक दिसतंय असं की त्या त्या राज्यांमध्ये राज्य सरकारचा आरोग्य विभाग, तेथील महानगरपालिका, स्थानिक यंत्रणा, विविध पातळ्यांवरील कर्मचारी असेच लोक अग्रभागी आहेत. तेच लोकांचे प्राण वाचवणं आणि त्यांना योग्य उपचार देणं ह्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. असं असताना केंद्रानं रेमडेसीविरचं व्यवस्थापन स्वत:कडे ठेवण्याचं प्रयोजन काय?

कोरोनाविरूध्दच्या ह्या लढाईत केंद्राची भूमिका ही सहाय्यकाची, समन्वयाची आणि मार्गदर्शनाची आहे. ह्यात प्रत्यक्षात अग्रणी आहे राज्य सरकारांची यंत्रणा. अशा परिस्थितीत केंद्रानं रेमडेसिविरच्या वितरणाची यंत्रणा स्वत:कडे ठेवू नये. ह्यातून प्रत्यक्ष काम करतात अशा यंत्रणांवरचा अविश्वास तर दिसतोच शिवाय त्यांच्या कडे असलेल्या स्थानिक परिस्थितीच्या आकलनाला आपण कमी लेखतो आहे असं दिसतं.

ह्याबाबतीत माझी आपल्याला नम्र विनंती आहे की रेमडेसिविर कसं घ्यायचं, कुठे, कसं वितरित करायचं ह्याची संपूर्ण जबाबदारी आपण राज्यांकडे सोपवावी. ते काम खरंतर केंद्राचं नाही.

कोरोनाविरूध्दची ही लढाई मोठी आहे. तिथे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन समन्वयानं, सहकार्यानं काम करण्याची गरज आहे. राज्य सरकारांच्या स्थानिक परिस्थितीबाबतच्या आकलनाचा आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणांचा इथे आपल्याला अधिक चांगल्या पध्दतीनं उपयोग करून घ्यायला हवा. आपल्या संविधानानं दिलेल्या संघराज्य पध्दतीचा आत्माही तोच आहे.

मला आशा आहे की आपण माझ्या ह्या विनंतीचा सकारात्मक विचार कराल अणि राज्य सरकारांना ह्या बाबतीतील प्रशासकीय स्वातंत्र्य द्याल.

 

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

आपला नम्र,

राज ठाकरे

अध्यक्ष,

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *